तुंग येथे श्री हनुमान मंदिर देवस्थान समितीतर्फे सत्कार
इस्लामपूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्र येत एफआरपी आदिक २०० रूपये दर देऊन ऊसदर कोंडी फोडतात. परंतु आपल्या जिल्ह्यातील ऊसदर कोंडी फोडण्यास कोण अटकाव घालते हे जिल्हयातील शेतकरी वर्गाला माहीत आहे. त्यामुळे जे तुमच्या अर्थकारणाला अडथळा ठरतात, त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केले.
तुंग (ता.मिरज) येथील श्री हनुमान मंदिर परिसर सुशोभीकरणास महायुती सरकारच्या माध्यमातून ४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधी मंजूर झाल्याबद्दल देवस्थान समितीतर्फे निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील,भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुरेखाताई जगताप, सरपंच विमलताई सूर्यवंशी, माजी उपसरपंच विलासराव डांगे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष विपुल डांगे, वसंतदादा कारखाना माजी संचालक सचिन डांगे, ट्रस्टी बाबासो गुरव प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, २००९ पासून तुम्हाला जो ऊसतोडीचा, कारखाना हडप केल्याचा, घराघरात भांडणे लावण्याचा जो त्रास होतोय, त्याच एकच कारण आहे, ते म्हणजे अनेक वर्षे एकाच माणसाच्या हाती तुम्ही दिलेली सत्ता. तुम्ही एकाच माणसाच्या हातात विकास सोसायटी, दूध संघ, साखर कारखाना, आमदारकी आदींच्या चाव्या दिल्याने त्यांचा एकाधिकारशाही पणा सुरू आहे. ही ताकद कोठून आल्या तर ती तुमच्या मतामधून आल्या. त्यामुळे आमदार बदला. मी एवढ्या वर्षे आमदार, मंत्री होतो म्हणाऱ्यांचे एक छत्र तुम्ही घालावा. त्यानंतर तुम्हाला नक्कीच बदल घडलेला दिसून येईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या. मी आमदार झाल्यावर आमदार फंडातून एखादा रस्ता कमी करेन. परंतु गावोगावी वजनकटा नक्कीच उभा करेन. त्या काट्यावर वजन करून तुम्ही तुमचा ऊस कारखान्याला घालवा. त्यावेळी कोणीही अधिकाऱ्यांवर दबाव टाकायला नसेल. आज पर्यंत तुमची लाखो रुपयांची झालेली लूट यापुढे कधीच होणार नाही, असा मी तुम्हाला विश्वास देतो.
यावेळी संजय सुतार, विजय खबीले, बजरंग शिंदे, सचिव संजय कुंभोजे, राहुल डांगे, रवी पाटील, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, ॲड.अंकिता मोहिते, महादेव पाटील,बजरंग पवार, दिलीप डांगे, संजय वाईंगडे, गुंधर बिरनाळे, सुधीर गोंधळी, भानुदास पाटोळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यमान आमदारांकडून जनतेची दिशाभूल....
येथील नागरिकांच्या मागणीनुसार श्री हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी मी पालकमंत्री ना. सुरेश खाडे यांच्याकडे माझ्या पत्राद्वारे ५ कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्याच पत्रावर ना.खाडे यांनी शिफारस करत ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून श्री हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी ४ कोटी ९९ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. परंतु आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय विद्यमान आमदार घेत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांची दिशाभूल सुरू आहे, असे ही निशिकांत भोसले-पाटील म्हणाले.