सांगली- (प्रतिनिधी)
‘‘महाराष्ट्रात कृष्णा नदीला महापूर येईल, अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होत आहे. महापुराचे हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आलमट्टी आणि कोयना धरणातील पाणीसाठा व्यवस्थापन व्हावे, याबाबत कडक सूचना द्याव्यात,’’ अशी अपेक्षा खासदार विशाल पाटील यांनी आज लोकसभेत केली.
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी विशाल पाटील यांनी महापुराच्या प्रश्नावर लक्ष वेधले. इंग्रजीतून त्यांनी प्रश्न मांडला. ते म्हणाले, ‘‘माझा सांगली मतदार संघ आणि पश्चिम महाराष्ट्र महापुराने प्रभावीत होत आला आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात सन २००५, २०१९ आणि २०२१ ला महाप्रलंयकारी महापूर आला होता. आज पुन्हा एकदा महापुराची गंभीर समस्या निर्माण होताना दिसत आहे. या स्थितीत केंद्रीय जल आयोगाच्या धरणातील पाणीसाठ्याबाबतच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. त्यात चार मुद्द्यांचा प्राधान्याने विचार करायला हवा, ज्यात कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांतील पाणी आणि कोयना, आलमट्टी धरणातील पाणीसाठा याचे ‘रिअल टाईम मॉनिटरिंग’ करणे, पूर व्यवस्थापन आराखडा राबवणे, पूरपट्ट्यात आवश्यक पायाभूत सुविधा देणे आणि महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील पाटबंधारे विभागाचा समन्वय हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. कारण, या महापुरात मनुष्यबळ, पशुधन, शेतीसह मालमत्तेची मोठी हानी होते. हे टाळण्यासाठी केंद्राने लक्ष द्यायला हवे.’’
‘आसामप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष द्या’
‘‘केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आसाममधील पूरबाधित क्षेत्राचा उल्लेख केला आहे. त्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित क्षेत्राचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे,’’ अशी भूमिका खासदार विशालदादा पाटील यांनी मांडली.
Tags
सांगली प्रतिनिधी