सांगली प्रतिनिधी
हजारो कोटींचा ज्यानी भ्रष्टाचार केला त्यांच्याच हातात सरकारी तिजोरीच्या चाव्या गेल्या. भाजपचे हे मंत्री टक्केवारीवरून ओळखले जातात, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी केला.सांगली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन यावेळी थोरात यांच्याहस्ते करण्यात आले.पद नसताना निधी आणणार्या, कोरोना आणि महापुरात काम करणार्या पृथ्वीराज यांना आमदार करा, असे आवाहन थोरात यांनी केले. विधानसभेला सांगलीतून जयश्रीताई की पृथ्वीराजबाबा हा निर्णय घेणे खूप कठीण होते. अत्यंत कठीण काळात शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज यांनी खूप काम केले. त्याचा अहवाल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पाहिल्यानंतर त्यांनीच पृथ्वीराज यांना उमेदवारी दिली. अशा वेळी जयश्रीताईंनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. तसेच लोकसभेला विशाल पाटील यांना तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि नागरिकांनी सर्वांनीच मदत केली. त्यात दादांच्या पुण्याईचीही मदत झाली असेल. आता त्यांना काय बोलणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोला थोरात यांनी लगावला.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, मला उमेदवारी मिळाल्यानंतर नगरसेवक, पदाधिकार्यांवर दबावाचे राजकारण झाली. बंडखोरी करणार्यांना भाजपचा पराभव करायचा आहे की पृथ्वीराज यांचा पराभव करायचा आहे की काँग्रेसचा पराभव करायचा आहे, असा सवाल त्यांनी केला. हरिदास पाटील यांनी, खासदारांनी आमचा भ्रमनिरास केल्याचे सांगितले. सभेस दिलीप पाटील, अभिजीत चौगुले, महाबळेश्वर चौगुले, अपर्णा कदम, आकाराम कदम, अभिजीत कोळी, सुवर्णा पाटील, विष्णू पाटील, संतोष पाटील, सुरेखा सातपुते, आनंदा पाटील, चंदन चव्हाण, प्रसाद रिसवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
सांगली प्रतिनिधी