सांगली : प्रतिनिधी
शोध पत्रकारितेच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड शहरातील प्रशासन व महायुतीच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा करणाऱ्या बातम्या एकत्रित करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला शहराचा गलथान कारभार मांडणारी पुस्तिका प्रकाशित करायची होती, त्यास प्रशासनाने परवानगी दिली नाही. त्यातील बातम्या पेड असल्याची बतावणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली. हा समस्त सांगलीतील वृत्तपत्रांचा अपमान आहे. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी केला.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ येथील मतदारांशी ते संवाद साधत होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, प्रभाग क्रमांक १२ मधील सर्वात मोठा प्रश्न पुराच्या पाण्याचा आहे. ज्या ठिकाणी पाणी आत शिरते तिथे संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. हा प्रश्न काही प्रमाणात सोडविण्याचे प्राधान्याने प्रयत्न करू.
शहरातील आयर्विन पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यासाठी मी निधी उपलब्ध करून दिला. अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य पुतळ्याचे स्मारक उभारले. सांगली मिरज रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. पूर बाधित लोकांना नोटीसा दिल्या गेल्या, त्या थांबविण्याचे काम केले. या शहरासाठी भाजपने काय केले? एक काम तरी सांगा.
मोदी साहेब येऊन म्हणाले सांगली चांगली करू. नेता भाषण करून गेल्यानंतर खाली काम होणे गरजेचे होते, ते झाले नाही. सुशिक्षित, सक्षम, आणि लोकांच्या कामासाठी पाठपुरावा करणारे उमेदवार आम्ही दिले आहेत. लोकं त्यांना भरभरून आशीर्वाद देतील हा विश्वास आहे.
यावेळी माजी मंत्री आ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, संजय बजाज, शेखर माने, जितेश कदम, अजित सुर्यवंशी, राहुल पवार, नितिन शिंदे, प्रभाग १२ चे उमेदवार प्रमोद सुर्यवंशी, मनोज फार्णे, सुरेखा म्हारगुडे, आशाताई शिंदे आदी उपस्थित होते.