इस्लामपूर : प्रतिनिधी
स्व.संभाजी पवार यांनी तुम्हा सभासदांकडून पै-पै गोळा करून काढलेला सर्वोदय साखर कारखाना कोणी घशात घातला, हे साऱ्या जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे स्व.आप्पांना व तुम्हा सभासदांना झालेला त्रास व यातनांची मला कल्पना आहे. त्या यातनाची परतफेड करण्याची आता योग्य वेळ आली आहे. २० तारखेला मतपेटीतून त्या प्रवृत्तीला उत्तर देऊन परिवर्तन घडवा, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केला
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील
कारंदवाडी, तुंग येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी भीमराव माने, सागर खोत, प्रसाद पाटील, केदार पाटील, निवास पाटील, संदीप सावंत, प्रमोद डांगे प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, तुंग व कारंदवाडी ही गावे एका वेगळ्या विचारांची आहेत. ज्या कारंदवाडीत स्व.वसंतदादांनी पाणी पुरवठा योजना आणून शेती हिरवीगार केली. इथल्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा फोटो नसणे, हे दुर्देवी आहे. राजकारण असावे पण एवढ्या खालच्या थराचे नसावे. येथील ऊस उत्पादक शेतकरी इर्षेने इथे ऊस पिकवतो. सुरेश कबाडे सारख्या संशोधकांना विरोधकांनी यांच्या कारखान्यात तज्ञ संचालक म्हणून घेतले असते शेती विकासाला ऊर्जा प्राप्त झाली असती. पण ते त्यांचे पाहुणे नसल्याने ही अडचण निर्माण झाली असेल. आमच्या ऊसाला चांगला दर मिळावा व काट्यात मारामारी होऊ नये, एवढीच येथील लोकांची अपेक्षा आहे. ऊस उत्पादक म्हणून तुम्ही आता जागरूक होण्याची गरज आहे. गेल्या ३५ वर्षाचा तुमच्या उसाच्या बिलाचा हिशोब काढा. जर तुम्हाला झोप लागली तर मला सांगा. तुमच्या कष्टाचे पैसे कोणाच्या घशात गेलेत, याचा विचार करा. माळेगावच्या साखर कारखान्याच्या रिकव्हरी कमी असून ही ३६३६ रुपये दर द्यायला परवडतो. मग येथील रिकव्हरी जास्त असून ही विरोधकांना दर का द्यायला परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतल्यावर काय होते हे त्यांना या निवडणुकीत परिवर्तन करून दाखवून द्या.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुसता लबाड लांडग्याचा धंदा....
निशिकांतदादांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून मतदार संघाचा विकास साधला. तुंग येथील मारुती मंदिर सुशिभिकरणासाठी कोणी पाठपुरावा केला व निधी मंजूर करून आणला, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधक हवालदिल झाले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरखु लागली आहे. त्यामुळे होत असलेल्या प्रचार सभांमध्ये आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे ते श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. जनतेला खर खोटे समजत. त्यामुळे त्यांनी आता लबाड लांडग्याचा धंदा बंद करावा, असा टोला सागर खोत यांनी यावेळी बोलताना लगावला.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी