भाजप उमेदवाराचा पाडाव स्वाभिमानी मतदारांनी करावा - आ. जयंतराव पाटील

 

स्व. शिवाजीराव देशमुखांच्या पुरोगामी विचारांना व निष्ठेला तिलांजली देणाऱ्या येथील भाजप उमेदवाराचा पाडाव स्वाभिमानी मतदारांनी करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंतराव पाटील यांनी केले. 

वाटेगाव (ता. वाळवा) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. मानसिंगभाऊ नाईक यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, उमेदवार मानसिंगभाऊ यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, स्व. शिवाजीराव देशमुखांनी उभ्या आयुष्यात जातीवादी शक्तींना विरोध केला. शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचारांची नेहमी पाठराखण केली. जातीयवादाची बिजे येथील मातील रुजणार नाहीत यासाठी संघर्ष केला. त्यांच्याच मुलाने भाजपात जाऊन येथे जातीयवादी शक्तींची बिजे रुजविण्याचा उद्योग सुरू केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रवृत्तींचा पराभव करा. प्रचंड महागाईला सामोरा घालवून लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये देणाऱ्यांनी कराच्या माध्यमातून जनतेची लूट चालवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास नियोजनपूर्वक मांडला आहे. जाती, धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. सर्वसामान्यांच्या प्रगतीआड येणाऱ्या सरकारला घालवण्यासाठी आपले उमेदवार मानसिंगभाऊंना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.

माजी राज्यमंत्री नाईक म्हणाले, विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या आ. मानसिंगभाऊंनी शिराळा मतदार संघात सर्वांगीण विकास साधला आहे. उद्योग, व्यवसायांना चालना दिली आहे. आरोग्य, वीज, दळणवळण, शिक्षण, पिण्याचे पाणी, शेती पाणी आदी सोई-सुविधा सक्षम केल्या आहेत. वारणा प्रकल्प व वाकुर्डे योजनेसाठी जयंतरावांच्या साथीने मोठा निधी आणला आहे. शिराळ्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी मंजूर केला आहे. विरोधी उमेदवाराकडे कसल्याही प्रकारचे कर्तृत्व नाही. स्व. देशमुखसाहेबानी सुरू केलेल्या संस्था मोडून खाण्याचे काम केले आहे. म्हणून तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण विकास साधणाऱ्या मानसिंगभाऊंना विजयी करावे. 

उमेदवार आ. मानसिंगभाऊ म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक गावात केलेल्या विकास कामाच्या व तुमच्या पाठिंब्यावर मी निवडणुकीस उभा आहे‌. माझे विधानसभेतील एक मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ताकद वाढवणारे आहे. अशा अनेक मतांनी ते उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. येथील विरोधी उमेदवारांनी आत्तापर्यंत काय दिवे लावलेले आहेत वडिलांनी काढलेल्या संस्था विकून टाकल्या आहेत. कर्तृत्व सिद्ध करू न शकलेली मंडळी मतदारांची फसगत करून मते मागत आहेत. 

यावेळी यशवंतचे अध्यक्ष रणधीर नाईक, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुक्याचे माजी सभापती रवींद्र बर्डे, रवींद्र दुकाने, सरपंच नंदाताई चौगुले यांची भाषणे झाली. माजी सभापती शुभांगी पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील व राहुल चव्हाण, माजी सरपंच मोहन चव्हाण, सुरेश साठे, डॉ. भूषण चौगुले, सोसायटी अध्यक्ष किरण नांगरे, कृष्णात नलवडे, विश्वाचे संचालक विश्वास पाटील, राजाभाऊ चव्हाण, सूतगिरणीचे संचालक हरिश्चंद्र औताडे, सुरेश जाधव, योगेश नलवडे, दिलीप कापसे, संदीप जाधव, अशोक शेटे, सुनील ढेबे आदी मान्यवर व परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post