भाजप ही जातीय विषवल्ली असून इतिहास बदलू पाहणाऱ्या प्रवृत्तीला सत्तेतून पाय उतार करण्याची गरज असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. मानसिंगभाऊ नाईक यांना विजयी करून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंतराव पाटील यांनी केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख म्हणायचे, भाजप हा पक्ष जातीयवादी पक्ष आहे. तो ठेचला पाहिजे. पण र्दुदैव त्यांचेच चिरंजीव जातीयवादी पक्षात गेले. आता ते निवडणुकीत आहेत. पदासाठी निष्ठा व विचार बदलणाऱ्या प्रवृत्तीचा मोठा पराभव करून बहुजन समाज एकसंध आहे, तो दाखवून द्यावे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचार जिवंत ठेवण्यासाठी व लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी महायुतीला सत्तेपासून दूर ठेवा. आपली लढाई जातीयवादी शक्तींशी आहे. महायुतीच्या मंडळींनी भरमसाठ महागाई वाढली आहे. राज्यात जातीय दंगली निर्माण व्हाव्यात, असे प्रयत्न केले गेले. माझी विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र पुन्हा एकदा सावरायचा असेल, तुमचा महागाईच्या ओझ्याने फाटलेला खिसा पुन्हा दुरुस्त करायचा असेल, तर आपल्याला पुन्हा हे सरकार घालवावेच लागेल. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आणण्यासाठी उमेदवार मानसिंगभाऊ नाईक यांच्या पाठीमागे खंबीर उभा रहा. तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करावे.
उमेदवार मानसिंगभाऊ म्हणाले, नेर्ले गावासाठी १८ कोटी रुपयांची कामे केली. विकास हाच उद्देश ठेवून आजवर काम केले आहे. ज्यांना सहकार संस्था टिकवता आल्या नाहीत, ते भाजपचे उमेदवार मतदार संघाचा विकास कसा करणार? मी कामे केली असतील तरच मला मत द्या. विरोधकांना संधी असूनही कर्तृत्व सिद्ध करता आलं नाही. मग तुम्ही मतदार संघ कसा सांभाळणार ? शिराळा मतदार संघातील स्वतःच्या नावावर मते मागता येत नाहीत, म्हणून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नावावर मतांचा जोगवा मागत फिरणार लबाडांना मतदारांनी पराभूत करावे. तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून मला आर्शिवाद द्यावा.