विधानसभेची निवडणूक ही दोन उमेदवारांच्यातील लढाई नाही तर ती जातीयवादी शक्तींच्या विरोधातील विचारांची लढाई आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारा शिराळा मतदार संघ जातीयवादी पक्षाला थारा देणार नाही. मानसिंगभाऊंना विजयी करून पुरोगामी विचार पुढे नेण्यास साथ करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे शिराळा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. मानसिंगभाऊ नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते.
प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभाव करीत आहे. राज्यातील उद्योग गुजरातला नेले. आपले मुख्यमंत्री फक्त खुर्ची टिकवण्यात व्यस्त होते. राज्याचे दरडोई उत्पन्न घटले आहे. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. यांना अर्थकारण जमले नाही. त्यामुळे राज्यावर कर्ज झाले आहे. देश व राज्य आर्थिक अडचणीत आहे. महागाई ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बेरोजगारी वाढली आहे. गुंतवणूक कमी झाली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर या निवडणुकीत महायुती सरकारला घावून आपले हित जपणारे महाविकास आघाडीचे सरकार आणावे.
आ. मानसिंगभाऊ म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक गावात केलेल्या विकास कामाच्या व तुमच्या पाठिंब्यावर मी निवडणुकीस उभा आहे . माझे विधानसभेतील एक मत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची ताकद वाढवणारे आहे. अशा अनेक मतांनी ते उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. येथील विरोधी भाजप उमेदवारांनी आत्तापर्यंत काय दिवे लावलेले आहेत. मतदार संघाच्या विकासात काडीचेही योगदान न देणाऱ्यांनी वडिलांनी काढलेल्या संस्था विकून टाकल्या आहेत. ते कोणत्याही प्रकारे कर्तृत्व सिद्ध करू न शकलेली मंडळी मतदारांची फसगत करून, भूलथापा मारून मते मागत आहेत.
शिवाजीराव नाईक म्हणाले, महायुतीचे सरकार थापा मारणारे आहे. त्यांच्यामुळे राज्याची अधोगती सुरू आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरून उद्योजकांची घरे भरणाऱ्या या सरकारला घरी बसवावे लागेल. मानसिंगराव नाईक यांनी विकासवादी दृष्टिकोण ठेवून मतदार संघातील मोठी विकासकामे केली आहेत. मतदारांनी सुरू असलेली विकासाची मालिका अखण्डित ठेवण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून मानसिंगभाऊंना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.
प्रारंभी मकरंद पाटील यांनी स्वागत केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक व बाजार समितीचे संचालक सी. एच. पाटील यांचे भाषण झाले. राजारामबापू बँकेचे संचालक डाँ. प्रकाश पाटील, माजी सरपंच डाँ. सचिन पाटील, दूध संघाचे संचालक विकास कांबळे, दिलीप पाटील, एस. आर. पाटील, रायसिंग पाटील, माणिक पाटील, प्रशांत पाटील, डॉ. सारीका पाटील, उपसरपंच प्रताप पाटील, श्रीकांत पाटील, शिवाजी जाधव, प्रमोद जाधव यांच्यासह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.