राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा , त्यासाठी मानसिंग नाईक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा - जयंत पाटील


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी शिराळा मतदार संघातून उभा राहिलेले राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगभाऊ नाईक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. आपण त्यांना दिलेले मत मला मिळणार आहे, याची जाणीव ठेवून मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी केले.
तांबवे (ता. वाळवा) येथे शिराळा मतदारसंघातील उमेदवार मानसिंगभाऊ नाईक यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार मानसिंगभाऊ नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, कृष्णेचे संचालक लिंबाजी पाटील, दिपकदादा पाटील, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने प्रमुख उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, आ. मानसिंगभाऊ यांनी गेल्या ५ वर्षात मतदारसंघाच्या विकासाला मोठी चालना दिली आहे. विकास कामात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांना तितक्याच मोठ्या मताधिक्याने विजयी करा. त्यांच्या विजयाने आपली राजकीय ताकद वाढणार आहे. कोणीतरी येईल, काहीतरी सांगेल. त्याला फसू नका. वाळवा-शिराळा तालुका हा लढवय्या व स्वाभिमानी क्रांतिकारकांचा तालुका आहे. येथे जातीयवाद्याना बिजे पेरू देवू नका. आपले नेते शरदचंद्र पवार हे मोदी-शहा या बलाढ्य ताकदीच्या विरोधात लढत आहेत. एक मावळा म्हणून आपणास त्याच्या पाठीशी उभा रहावे लागेल. भाजपा नेत्यांच्या बोलणे आणि कृतीत फरक आहे. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच घेऊन मंत्रीमंडळ केले. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात. सावधपणे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबा. 
आ. मानसिंगभाऊ म्हणाले, आपले नेते प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांना राज्याच्या सर्वोच्चपदी बसविण्याचे काम या निवडणुकीतून होणार आहे. तुमचे मत मला, माझे मत पाटीलसाहेबांना. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला ताकद द्यावी. आपण गेल्या ५ वर्षात आपल्या मतदारसंघात चांगला विकासात्मक बदल घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भाजप महायुतीचे राज्य सरकार हे उद्योगपतींना पोसणारे शेतकरी विरोधी आहे. उद्योजक त्यांच्या मालाचा दर ते ठरवितात, मग शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाचा दर ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना का नाही? 
माजी राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले, माझे दोन शिलेदार विरोधी बाजूस गेल्याचे कुठे तरी वाचले. ते माझे शिलेदार होते, मग पळून का गेले? असल्या प्रकारावर विश्वास ठेवू नका. मानसिंगभाऊं सारख्या विकासवादी नेतृत्वास मतदारांनी आणखी काम करण्याची ताकद द्यावी. त्यांना यावेळेसही विधानसभेवर मोठ्या मताधिक्याने पाठवावे. 
यावेळी यशवंतचे अध्यक्ष श्री. नाईक, संजय पाटील, धोत्रेवाडीचे सरपंच प्रदीप माने, तांबवेचे उपसरपंच अवधूत पाटील, शिवाजी पाटील, येवलेवाडीचे बालाजी जगताप, कापुसखेडचे माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, प्रा. दिलीप पाटील यांनी मानसिंगभाऊंना मोठे मताधिक्य देऊ, अशी मनोगतातून ग्वाही दिली.
सरपंच सुभाष करांडे, के. के. पाटील, ब्रह्मानंद पाटील, डॉ. अशोक पाटील, तानाजी मोरे, अशोक मोरे, के. डी. शेळके, रामभाऊ माळी, पोपटराव जगताप यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी, नेते मंडळी व स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post