एमआयडीसी च्या माध्यमातून विरोधकांचे जनतेला फसविण्याचे काम - संजयकाका पाटील



कवठेमहांकाळ प्रतिनिधी /
      एमआयडीसीच्या माध्यमातून जनतेला फसविण्याचे काम विरोधक करीत आहेत , अशी टीका तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे व राष्ट्रवादी कॅांग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. 
   खोटी आश्वासने देऊन जनतेचा भुलभुलैय्या करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून जनता विरोधकांच्या प्रयत्नांना फसणार नाही. विकासाचे काम कोण करते याची जनतेला जाणीव असून या पुढच्या काळात विरोधकांना जनता त्यांची जागा दाखवून देतील, असेही संजयकाका पाटील म्हणाले. 
  गेल्या ३५ वर्षात विरोधकांच्याकडे सत्ता होती. महत्वाची मंत्रीपदे होती परंतु तासगाव व कवठेमहांकाळमध्ये कोणते उद्योग त्यांनी आणले व सुरु केले असा सवाल संजयकाका पाटील यांनी केला.
   म्हैसाळ आणि टेंभू योजनांसाठी माजी मंत्री अजितराव घोरपडे व आपण मोठे काम केले आहे. सध्या सुमारे साडे चार हजार कोटींची कामे सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत या दोन्ही योजनचे पाणी पोहचविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही पाटील यांनी दिले. 
    तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आपल्याला मतदारातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावाही संजयकाका पाटील यांनी केला. 
    यावेळी राजवर्दन घोरपडे, मिलिंद कोरे, पांडुरंग पाटील, आजम इनामदार, जलाल शेकडे, जगन्नाथ शिंदे, ईश्वर वनखडे, अजय पाटील, विलास शिंदे यांच्यासह नेते उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post