१९७८ ची पुनरावृत्ती करत इतिहास घडवा - गौरव नायकवडी : आष्टा येथे प्रचार सभा

इस्लामपूर : प्रतिनिधी
इस्लामपूर मतदार संघात बदलाच्या दृष्टीने चांगला उठाव झाला आहे. गेली ३५ वर्षे आपल्या खाद्यावर बसलेले हे भूत आता उतरायचे आहे. तुम्ही दबावतंत्राला बळी न पडता निशिकांतदादांना निवडून देऊन बदल घडवा व भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडलेल्या विरोधकांना पाडून १९७८ ची पुनरावृत्ती करत इतिहास घडवा, असे आवाहन शिवसेनेचे नेते व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी केले. 

आष्टा येथे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सतीश बापट, पोपट भानुसे, प्रवीण माने, अमोल पडळकर, दिलीप मोरे, नंदकिशोर आटूगडे, निलेश कोळी, 
दयानंद सुजातक, अर्चनाताई माळी, शोभाताई हालुंडे प्रमुख उपस्थित होते.

गौरव नायकवडी म्हणाले, आष्टा शहरातून चांगला उठाव झाला आहे. तसेच मतदार संघात चांगले वातावरण आहे. एकास एक निवडणुकीने विरोधक हवालदिल झाले आहेत. जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतली आहे. निवडणूक ही विकास कामांवर झाली पाहिजे, असे आमचे मत आहे. पण आजपर्यंत दबाव तंत्र अवलंबून निवडणुका झाल्या. निवडणुका आल्यावर मतदारांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या व पुन्हा पाच वर्षे तिकडे पाठ फिरवायची, हेच काम विद्यमान आमदारांनी आजपर्यंत केलं आहे. आता आशा नेतृत्वाला धडा शिकवण्याची संधी आपलेला मिळाली आहे. या मिळालेल्या संधीचे सोने करूया व १९७८ ची पुनरावृत्ती घडवूया.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या विकासाकडे पाठ फिरवणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्वांना बदल घडवायचा असल्याने सर्व एकदलाने काम करत आहेत. मला या निवडणुकीत आशीर्वाद द्या, येणाऱ्या पाच वर्षात आष्टा शहराचा चौफेर विकास करेन, हा तुम्हाला मी यानिमित्ताने शब्द देतो.

दरम्यान, भारतीय दलित महासंघ व कोळी समाजतर्फे निशिकांतदादांना पाठींबा देण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 तुमचा ऊस न्यायची जबाबदारी माझी राहील....
     या परिवर्तनाच्या लाटेत तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडू नका. ऊस, रस्ता, पाण्याची अडवणूक होईल, ही भीती मनातून काढून टाकून बदलाच्या लढाईत सामील व्हा व निशिकांतदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या. तुमचा ऊस न्यायची जबाबदारी माझी राहील. तुम्हाला एक ही अडचण येणार नाही. हुतात्मा संकुलाने एकदा शब्द दिला की आम्ही मागे हटत नाही, असे ही गौरव नायकवडी म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post