शरद पवार यांच्या चार पिढ्या जरी आल्या तरीही आम्ही जम्मू काश्मीर मधील 370 कलम मागे घेणार नाही -गृहमंत्री अमित शहा

 



सांगली प्रतिनिधी
राज्यात महायुतीचा सरकार आल्यानंतर केंद्रातील सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य बनवले जाईल, तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चार पिढ्या जरी आल्या, तरी आम्ही जम्मू काश्मीरमधील कलम 370 मागे घेणार नाही. कलम 370 हटवायला पाहिजे होते की नव्हतं?
असा सवाल करून आता जम्मू काश्मीरच्या विधानसभेत कलम 370 पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ते शिराळा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कोठेही जावा, तेथे महायुती सरकार येईल, अशीच परिस्थिती आहे. देशात पंतप्रधान मोदींचे सरकार असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश बनला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार बनवा. राज्यात महायुतीचा सरकार आल्यानंतर केंद्रातील सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य बनवले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे की नको?, असा सवाल करून महाविकास आघाडीतील नेते संभाजीनगर नाव करायला विरोध करत आहेत. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे देखील औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाला विरोध करत आहेत. पण ते आम्ही करून दाखवले आहे. छत्रपती संभाजीनगर असेच नाव राहिल, आता हे कोणीही बदलू शकत नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

वक्फ बोर्डाला उद्धव ठाकरे यांनी विरोध करणार का? हे त्यांनी सांगावं. जोपर्यंत देशात नरेंद्र मोदी यांचा सरकार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना हात लागणार नाही. अयोध्येत राम मंदिर बनायला पाहिजे होतं की नव्हतं?, पंतप्रधान मोदी यांनी सरकार आल्यानंतर पाच वर्षांमध्ये राम मंदिर तयार करून दाखविले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही राम मंदिरात गेले नाहीत. कारण त्यांना वोट बँकेचे भीती वाटत आहे, असा निशाणा त्यांनी साधला.

शिराळातील नागपंचमी उत्सव पुन्हा सुरू होईल, त्याला आता कोणीही अडवू शकत नाही. दहा वर्ष राज्यात आघाडीच सत्ता असताना शरद पवार यांनी काय केले, याचे उत्तर द्यावे. मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वाधिक निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे जाळे उभारले आहे. आयुष्मान भारत योजनेतून 10 लाख लोकांना योजनेचा लाभ दिला आहे. सात लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच

महाविकास आघाडीचे सरकार चुकून जरी आले, तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना आणि शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना तर काँग्रेस एक डझन लोकांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी तयार आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात वादा करताना सांभाळून करा. परंतु, काँग्रेसचे खटाखट वाले नेते असे वादे करतात की, जे कधी पूर्णच होणार नाहीत, असा टोला त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लगावला.

सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचे सरकार असताना दररोज आतंकवादी हल्ले होत होते. मोदींचे सरकार असताना पुलवामा हल्ला झाला. परंतु, दहाच दिवसांत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केले. आघाडीवाले देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत, देशाला सन्मान देऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post