इस्लामपूर : प्रतिनिधी
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील एकास एक लढतीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू निसटू लागली आहे. ही निवडणूक गुंडागर्दी करून नाहीतर विकासाच्या मुद्यावर झाली पाहिजे, असे आमचे मत आहे. कारण हा मतदारसंघ भीतीच्या छायेखाली वावरतोय. तो आम्हाला भयमुक्त करायचा आहे. पण या निवडणुकीत गुंडागर्दी झालीच तर आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आ.सदाभाऊ खोत यांनी दिला.
साखराळे (ता.वाळवा) येथे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार
निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. प्रसाद पाटील, केदार पाटील, मधुकर हुबाले प्रमुख उपस्थित होते.
आ.सदाभाऊ खोत म्हणाले, इथे बोलायला बंदी आहे. चालायला बंदी आहे. काम करायला बंदी आहे. पण भविष्यात ही बंदी तोडायला हवी. किती दिवस तुम्ही भीतीच्या छायेखाली वावरणार आहात. येथील विद्यमान आमदार म्हणतात तुमचा विकास साधायचा असेल तर मला निवडून द्या. पण तुम्ही त्यांना ३५ वर्षे निवडून दिल. मग इतक्या वर्षात त्यांनी का विकास केला नाही, हा त्यांना जाब विचारण्याची ही वेळ आहे. गळीत हंगामात बाजार पेठेत साखरेचा दर पडल्याचे कारण सांगून हे शेतकऱ्यांच्या उसाला कमी हमीभाव देतात. तसेच ती साखर कमी दराने घेऊन साठवणूक करतात. गळीत हंगाम संपल्यानंतर तीच साखर चढ्या दराने विक्री करून आपली घरे भरतात. यांना बारामती तालुक्यासारखा विकास करता आला नाही. निदान त्यांनी बारामती तालुक्यातील साखर कारखान्याच्या बरोबर ऊसदर दायला हवा होता. यामुळे आता महिन्याला पैसे देणाऱ्याला मत द्यायच का उसाचे पैसे बुडवणाऱ्याला मत द्यायचं, हे तुम्ही ठरवा. हे महायुती सरकार देणारे आहे, घेणारे नाही.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, राख कशी असावी, राख कशी सोसावी, हे सगळं तुम्ही सोसल आहे. या गावातील मंदिरात जाण्यास बंदी घातल्याचे समजते. एमआयडीसीमधील जागांवर कोणाच्या पै-पाहुण्यांनी कब्जा आहे, हे तुम्हाला माहित आहे. इथे कोणत्या कंपन्या यायला तयार नाहीत. लोकांना रोजगार नाही. निवडणूक आलीकी नोकऱ्या लावण्यासाठी यांची यादी तयार होते. टेबल टाकले जातात. पण निवडणूक झाली की नोकऱ्या जातात व तरूण बेरोजगार झालेला आपणाला पाहायला मिळतो. मला एक संधी द्या. तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावतो. या आमदारांसारखे तुम्हाला मला मुंबईला शोधायला यायला लागणार नाही. तर मी स्वतः तुमच्या सेवेसाठी इथे उपलब्ध असेन.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमआयडीसीतील जागांवर प्लॉटिंग...
इस्लामपुरात असणारी एमआयडीसी ही एमआयडीसी राहिली नसून तिथे घरकुले झाली आहेत. छोटे-छोटे बोर्ड लावून तिथे प्लॉटिंग पाडले गेले आहे. तो कब्जा कोणाचा आहे, हे तुम्हाला माहिती आहे. विरोधकांनी इथे नवीन उद्योग आणण्यासाठी कधी प्रयत्न केले नाहीत. कोणी आणायला गेले तर त्यांना चालत नाही. तसेच त्यांना तालुक्यातील कोण मोठा झालेला चालत नाही. शाळा, कॉलेज, कारखाने त्यांनाच पाहिजेत. अशी भावना असणाऱ्या या नेत्याच्या सर्व पराक्रमाचा गट्टा माझ्याकडे मुंबईहून आला आहे. योग्य वेळी ते पान उघडीन.कारखाना नावाला सहकारी शेतकर्यांचा आहे.येथील ऊस उत्पादक सभासदत्वाचा व वारस हक्काचा हक्क मागतो,मात्र हे महाशय हक्क देत नाहीत हा शेतकर्यांचा अवमान आहे.