सांगली विधानसभेच्या निवडणुकीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील पृथ्वीराज बाबा पाटील


सांगली प्रतिनिधी
सांगली मतदारसंघातून जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे, उमेदवारी मागण्याचा त्यांना हक्क आहे. वहिनी आदरस्थानी आहेत, त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घेतील, असे काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष तथा विधानसभेसाठी इच्छूक असलेले पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णयही जयश्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही सांगलीतून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी मागील निवडणूक सांगलीतून लढवली होती, त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे माप टाकतात, हे आता पाहावे लागणार आहे.

उमेदवारीचा निर्णय लोकशाही पद्धतीने घेण्याचा काँग्रेस पक्षात प्रघात आहे. उमेदवारीसाठी सर्वांना एकाच मांडवाखालून जावे लागते. जयश्रीताई पाटील यांनी सांगलीतून उमेदवारी मागितली आहे, त्यावर मी काही बोलणार नाही. कारण, मदनभाऊ आणि आम्ही एकत्र वाढलो आहोत. आम्हाला जयश्रीवाहिनी आदरस्थानी आहे, असे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले.
सांगलीच्या उमेदवारीचा निर्णय हायकमांड घेतील. पण, भाजप आमचा मुख्य विरोधक आहे. काँग्रेस पक्षात फूट पाडून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा अजेंडा आहे. सांगलीत लोकसभेला झालेल्या पराभवानंतर भाजपने तो डाव आखला आहे. पण आम्ही तो डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

सांगली विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी माझा निसटता पराभव झाला होता. मात्र, मला ८७ हजार मते मिळाली होती. त्या मतदारांसाठी मी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो होतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आठशे कोटींची कामे आणली आहे. काँग्रेस पक्षाचे काम आम्ही जनतेमध्ये नेले आहे, असा दावाही त्यांनी केला.

पृथ्वीराज पाटील हे संवाद सांगलीसाठी हा उपक्रम सुरू करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी विधानसभा उमेदवारीच्या अनुषंगाने भाष्य केले आहे. आता सांगलीतून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post