विद्यमान आमदार मुंबईत सत्तेच्या वाटा मळण्यात व्यस्त

 


निशिकांत भोसले-पाटील (दादा) : वाळवा येथे ५४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ


इस्लामपूर : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील प्रगती त्या भागातील वाटेवरून दिसून येते. वाट चांगली असेल तर प्रगतीची चाकेही गतिमान होतात. परंतु विद्यमान आमदार गेली ३५ वर्षे मुंबईत सत्तेच्या वाटा मळण्यात व्यस्त असल्याने त्यांना त्यांच्या  इस्लामपूर मतदार संघातील पाणंद रस्त्यांची लागलेली वाट दिसून आली नाही. शेतकऱ्याच्या हालाला कारणीभूत असणाऱ्या या लोकप्रतिनिधीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केले.


वाळवा येथे ५४ लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम शिंदे,  तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते.


निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले,  इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद  रस्त्यांची दैना उडाल्याने अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना खते, धाने, आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या प्रश्नी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा येथील आमदारांकडे पाणंद रस्ते करावेत, यासाठी मागणी लावून धरली होती. निवडणूक आली की हे आमदार आश्वासन द्यायचे. निवडणूक संपली की, मागे तसे पुढे. हे अनेक वर्षे चालूच आहे. हे खरे येथील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. परंतु ही चूक तुमची आहे. तुम्ही गेले ३५ वर्षे एकाच माणसाला निवडून देत आहात. त्यामुळे हा माणूस हुकूमशाही पद्धतीने तुमच्यावर राज्य करीत आहे. तुम्ही माणूस बदलून पहा. येणाऱ्या पाच वर्षात इस्लामपूर मतदार संघाचा कायापालट नक्की झालेला दिसेल, असा मी तुम्हाला विश्वास देतो. आता आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघातील पाणंद रस्त्यांसाठी मोठा निधी आणला आहे. काही दिवसात हे रस्ते कात टाकतील. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे जीवन बदलून जाईल. महायुती सरकार कायम शेतकरी हित जपत आले आहे. 


यावेळी वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष अभिजित पाटील, इस्लामपूर भाजपा शहर अध्यक्ष अशोक खोत, डॉ.प्रकाश भोसले, दिनकर देवकर, चंद्रकांत डांगे, प्रदीप थोरात, शिवाजी कदम, डॉ.ज्योत्स्ना अहिर, अभिजित थोरात,योगेश मोरे,अनिल लोहार,विकास जाधव , सत्यजित पाटील, प्रफुल्ल गणेशकर, अभिजित खोत, अमोल कोकाटे, बजरंग गावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post