इस्लामपूर : प्रतिनिधी
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात गेल्या "३०- ४० वर्षांत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. चार-चार वेळा नारळ फुटूनही विकास कामे मार्गी लागली नाहीत, ही मतदार संघातील नागरिकांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींना जाग आली आहे. त्यांचे बगलबच्चे आता गावागावात फिरून लोकांना अडी-अडचणी विचारू लागले आहेत. सतरा वर्षे त्यांचे नेते मंत्री होते. त्यांनी मंत्रीपदाच्या काळात काय केले?, असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी उपस्थित केला. कवठेपिरान (ता.मिरज) येथील गजानन सावंत ते सकळे डॉक्टर घर व चर्मकार वसाहत ते नदिवेस गल्ली येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच भीमराव माने, सरपंच अनिता माने, उपसरपंच नंदकुमार उर्फ सुशांत देसाई प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, आ.जयंत पाटील हे अनेक वर्षे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहेत. तसेच त्यांनी राज्य मंत्रीमंडळात मोठी पदे भूषवली आहेत. असे असताना त्यांना मतदारसंघातील अनेक गावातील अंडर ग्राऊंड ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, अंतर्गत रस्ते करता आले नाहीत. मोठे उद्योग मतदार संघात आणून तरुणांना रोजगार देता आला नाही. चांदोली धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावता आले नाहीत. ते शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवता मग ते ऊसदर कोंडी फोडण्यात का मागे असतात, याचे उत्तर त्यांनी द्यावे. तसेच त्यांनी एका कामाचे नारळ चार-चार वेळा फोडले. परंतु त्यांना ती कामे मार्गी लावता आली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.
भीमराव माने म्हणाले, निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी कवठेपिराण गावच्या विकासासाठी विविध योजनांमधून निधी मिळवून दिला आहे. प्रत्यक्ष काम करणारा माणूस आज तुमच्यासमोर उभा आहे. इस्लामपूर मतदार संघातील परिवर्तनाची नांदी आजपासून सुरू होईल.
यावेळी सोसायटी अध्यक्ष रघुनाथ दींडे, उपाध्यक्ष भानुदास पाडळे, संचालक अमोल पाटील, सर्जेराव पाटील, माणिक पाटील, जितेंद्र साळुंखे, सुखदेव कार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य दिनकर गायकवाड, बाबासो येडके, बंडा तामगावे, दत्तात्रय भोसले, ग्रामसेवक अविनाश धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.