जत प्रतिनिधी : विस्तारित म्हैसाळ आणि टेंभू योजनेच्या माध्यमातून जत तालुक्याला पाणी देऊन २०१४ घ्या निवडणूकीत दिलेला शब्द पाळला असल्यामुळे या तालुक्यातून रेकॉर्ड ब्रेक मते मला मिळणार आहेत, असा विश्वास सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.
जत तालुक्यातील कुंभारी, कोसारी, गुळवंची, बेवनूर, वाळेखिंडी, नवाळवाडी, शेगाव, कासलिंगवाडी, बागलवाडी, मोकाशवाडी, सिंगनहळ्ळी, बनाळी, रेवनाळ, अचकणहळ्ळी, वायफळ, अंत्राळ, लोहगाव, आंवढी, येळवी, खैराव, टोणेवाडी, करजनगी, निगडी खुर्द या गावातील लोकांशी विविध ठिकाणी एकत्र येऊन संवाद झाला. यावेळी संजयकाका बोलत होते. या प्रचार दौऱ्याला जत तालुक्यातील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
संजयकाका पाटील म्हणाले, २०१४ च्या निवडणूकीत आलो तेव्हा लोकांनी फक्त म्हैसाळ योजना पूर्ण करण्याची मागणी केली होती. दुष्काळामुळे या भागातील माणसं ऊस तोडणी करायला स्थलांतर करत होती. आता विस्तारित म्हैसाळ, टेंभू योजनांच्या माध्यमातून जत तालुक्यात पाणी आणले आहे. जत तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी जलक्रांती केली आहे. जत भागाला पाणी दिल्याने या भागाची 'न भूतो' अशी प्रगती होत आहे. हरितक्रांतीमुळे भागाचा विकास झपाट्याने होत आहे. लोक सुखावली आहेत. तालुक्यातील ज्या भागात अजून पाणी पोहचले नाही, त्या भागातही लवकरच पाणी पोहचणार आहे. विस्तारित पाणी योजनांच्या निविदा निघाल्या असून तेही काम इयत्ता वर्ष दीड वर्षात पूर्ण होणार आहे. येत्या काळात या भागातील दुष्काळ संपूर्णपणे संपवण्याचा निर्धार आहे.
नागरिकांनी झालेल्या कामाचे कौतुक केले आणि दुष्काळ पुर्णपणे संपवण्यासाठी ७ मे ला भाजपाला साथ देण्याचा निर्धार केला.
या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
Tags
जत प्रतिनिधी