जीवनात आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. पण दुर्दैवाने क्षणिक सुखाच्या मोहापायी आपल्याजवळचा आनंद डावलून त्याचा बाह्य जगतात शोध घेत वणवण करतो, असे मत व्याख्याते शशांक खोत यांनी व्यक्त केले. येथील श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये बसव जयंतीमहोत्सवांतर्गत बसव व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनात श्वासाचे महत्त्व’ या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.
बसवमूर्ती पूजन आणि श्री अक्कमहादेवी वीरशैव महिला भजनी मंडळातर्फे रुद्रपठणाने व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोर्डिंगचे अध्यक्ष सुशील हडदरे, महोत्सव समिती अध्यक्ष रोहित हिडदुगी, सेक्रेटरी सुनील कोरे, खजिनदार विनायक शेटे, संचालक रमेश दडगे, सुनिता आरळी, रविंद्र मिरजकर, विद्या झाडबुके, आशा कोरे, व्यवस्थापक सतीश मगदूम, राजेश साबणे, प्रशांत सावर्डेकर, सुधीर म्हेत्री, नंदकुमार अंगडी आदी उपस्थित होते.
खोत म्हणाले, सुख म्हणजे काय, तर मनाप्रमाणे अनुकूल काम होणारी अवस्था म्हणजेच सुख. ते क्षणिक असते. परंतु आनंद हा आपल्या अंगात आपल्याजवळच असतो. आनंदी होण्यासाठी चांगले शरीर, चांगले मन, अवतीभोवतीचा समाज आणि आपली ओळख याची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने या सर्वाला तणावरूपी महामारीचा आजार लागल्याने आनंद हरवून बसतो. दुर्दैवाने ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) सर्व्हेक्षणानुसार 95 टक्के लोक हे मानसिक आजाराने ग्रासलेले आहेत. दुसरीकडे 85 टक्के लोक हे शारीरिक आजाराने हैराण आहेत. रक्तदाब, मधुमेहासह विविध आजारांना माणसाने स्वत:च ओढावून घेतले आहे. आपल्याला आवश्यक काय यापेक्षा सर्व काही ओरबडणे आणि मिळविण्याच्या हव्यासातून आपण आनंद हरवून चाललो आहोत.
वास्तविक आपण या सर्व गोष्टी आपल्याजवळ असूनही त्या गमावून बसत आहोत. तणावमुक्ती आणि तंदुरुस्तीतून स्वास्थ्य आणि त्यासोबतच श्वासाची गरज आहे. जे आहे ते आपले आणि जे नाही ते आपले नव्हते हे लक्षात घेऊन आनंदी राहणे यालाच जीवन म्हणतात.
अध्यक्ष हडदरे यांनी प्रास्ताविकात बोर्डिंगच्या वाटचालीचा आढावा घेतला. लवकरच भव्य महादेव मंदिराची उभारणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच लिंगायत बोर्डिंगची भव्य अशी वास्तु उभारून शहराच्या लौकिकात भर घालण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन सतीश मगदूम यांनी केले.
आजपासून सकाळी 7 ते 8 परमरहस्य ग्रंथ पारायणाचा प्रारंभ झाला. हभप रामलिंग घेवारी, महादेव विसापुरे व माहेश्वरमूर्ती प्रसाद हिरेमठ स्वामी यांनी याचे नियोजन केले.
Tags
सांगली प्रतिनिधी