विले-पार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोझर लावून उध्वस्त केले. देशभर व विशेषकरून महाराष्ट्रातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याचे तीव्र पडसाद समस्त जैन व अहिंसाप्रेमी समाजात उमटले आहेत.
तीर्थंकर हे जगा आणि जगू द्या या संदेशाचे नायक आहेत. त्यांच्या उपदेशाने देशात शांती, सहिष्णुतेचा महामार्ग प्रशस्त झाला आहे. स्वातंत्र व लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या तीर्थंकरांचे मंदिर उध्वस्त करुन महापालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणली हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनीय व समर्थनीय नाही.
दि.१९ एप्रिल २०२५ रोजी सांगलीत जैन बोर्डिंग मध्ये सांगलीतील सकल जैन समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. जैन मंदिर होते त्या ठिकाणी पूर्ववत महापालिका प्रशासनाने बांधून द्यावे व याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करुन कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली.
शासनाला याचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५ रोजी सकल जैन समाज सांगली यांच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आक्रोश मोर्चा विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून स. ९.०० वा सुरु होऊन कलेक्टर ऑफिससमोर मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन मा. जिल्हाधिकारीसो यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये सर्व जैन समाजासह दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी, मूर्तीपूजक समाज सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील माननीय खासदार व आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाचे गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून द्यावे आणि या आक्रोश मोर्चेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेसाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील, चेअरमन श्री. रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, श्री. रोहन मेहता, श्री. जतीन शहा, श्री. महावीर बनसाली, श्री. साईल शहा, श्री. जयेश जैन आदि मान्यवर उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी