वडील मंत्री होते, तुम्ही अनेक वर्षे मंत्री होता. पण तुम्ही जनतेसाठी काय केलं - सदाभाऊ खोत



इस्लामपूर : प्रतिनिधी
वडील मंत्री होते, तुम्ही अनेक वर्षे मंत्री होता. पण तुम्ही जनतेसाठी काय केलं? तुम्ही जनतेसाठी काहीच करू शकला नाही, तुम्ही फक्त स्वतःच्या तुंबड्या भरल्या, लबाड बोलून फार काळ नेतृत्व करता येत नाही. लबाडांना जनता आता जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही,मतदारांनी निर्णय पक्का केला आहे.तेवीस तारखेला महायुती इस्लामपुर मतदार संघासह महाराष्ट्रात विजयउत्सव साजरा करेल असा विश्वास आ.सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आनंदराव पवार, पृथ्वीराज पवार, राहुल महाडिक, जयवंत पाटील, संजय कोरे, विक्रम पाटील, निवास पाटील, केदार पाटील, सागर मलगुंडे, अशोक खोत, वैभव पवार, अमित ओसवाल, सतिश महाडीक, एल.एन. शहा, सनी खराडे,आरपीआय चे सचिन जाधव, भास्कर कदम, अजित पाटील, अक्षय पाटील, सतेज पाटील, महावीर कांबळे प्रमुख उपस्थित होते.

आ.सदाभाऊ खोत म्हणाले, या शहराला शहराचा आमदार करण्याची पहिली संधी मिळाली आहे, त्या संधीचे सोने करा. आपल्याला हा तालुका भयमुक्त करायचा आहे. या शहराने नगरपालिका निवडणुकीत क्रांती केली होती. आता विधानसभेला ही येथील जनता क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांना ३५ वर्षात इस्लामपूर एमआयडीसीमध्ये एकही नवीन उद्योग आणता आला नाही. तेथे आता प्लाॅल्टिंग पडून लोकवस्ती झाली आहे. 

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, विरोधकांना ३५ वर्षात भाजी मंडईचा प्रश्न का सोडवता आला नाही. अत्याधुनिक बसस्थानक, तालुका क्रीडा संकुल उभारता का आले नाही. पेठ-सांगली रस्ता व रिंगरोड झाला असता तर येथील व्यापाराला चालना मिळाली असती. परंतु यांनी आजपर्यंत फक्त गुंडगिरीला प्रोत्साहन दिले. कोरोना व महापूरसारख्या आपत्ती हे लोकप्रतिनिधी कुठे गायब होते. मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर जाणारे नगरसेवक व घंटा गाडीतून दारू वाहतूक करणारे नगरसेवकाला कुणी पाठीशी घातले, हे येथील जनतेला माहीत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी आमच्या प्रस्तावित कामाच्या फायली पेंडीग ठेवल्या. महायुती सरकार आल्यानंतर २४ बाय ७ पाणी योजना मार्गी लागली. विरोधक म्हणतात माझ्या विरोधात उभा राहिलेला माणूस पुढल्या वर्षी माझ्या विरोधात उभा राहत नाही. परंतु मी त्यांना सांगेन या संभूआप्पांच्या पांढरीत अहंकार व आहमपणा चालत नाही. जनताच आता त्यांचा आहमपणा दूर करेल. 

यावेळी राहुल महाडिक, आनंदराव पवार, विक्रम पाटील, केदार पाटील, प्रसाद पाटील यांची भाषणे झाली. दरम्यान, कारंदवाडी, साखराळे, हुबालवाडी येथील जयंत पाटील गटातील कार्यकर्त्यांनी निशिकांतदादांना पाठींबा देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा बँकेतील घोटाळ्याची कागदपत्रे माझ्याकडे....
     महायुती सरकारच्या काळात एक ही घोटाळा घडला नाही. पण महाविकास आघाडीच्या काळात घोटाळेच घोटाळे उघडकीस आले. आमचे सरकार आल्यावर पहिल्यांदा आम्ही दोन कारखान्यामधील अंतर काढून टाकू. मग बघा तुमच्या उसाला कसा दर मिळतोय. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. तर आम्ही जिल्हा बँकेतील घोटाळ्याची कागदपत्रे काढून ठेवली आहेत. फक्त निवडणूक होउदे. मग समजेल नोकर भरतीत काय झालं व कोणी काय खाल्लं, असा इशारा ही यावेळी आ.सदाभाऊ खोत यांनी दिला.


Post a Comment

Previous Post Next Post