जनतेने त्यांना ३५ वर्षे सेवा करण्याची संधी दिली होती, पण त्यांनी येथील मतदारांची निराशा केली - निशिकांत पाटील

निशिकांत भोसले-पाटील (दादा) वाळवा प्रचार सभा

इस्लामपूर : प्रतिनिधी
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचा विकास खुंटवून लोकांच्या भावनांशी खेळणारे व बाहेर आपण कर्तुत्ववान असल्याचा आव आणणारे विद्यमान आमदार आता गावोगावी जाऊन मला तुमची सेवा करण्याची शेवटची संधी द्या, असे म्हणत आहेत. पण येथील जनतेने त्यांना ३५ वर्षे सेवा करण्याची संधी दिली होती, पण त्यांनी येथील मतदारांची निराशा केली तर मग आता विधीमंडळात जाण्याचा त्यांचा हट्ट कशासाठी, अशी खोचक टीका इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केली.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील वाळवा येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते.  यावेळी गौरव नायकवडी, राहुल महाडिक, पृथ्वीराज पवार, विक्रम पाटील, केदार पाटील, प्रसाद पाटील, निवास पाटील, भगवान पाटील, संदेश कांबळे, केदार नायकवडी, अमोल पडळकर, सनी अहिर, विक्रम शिंदे, अभिजित पाटील, उमेश घोरपडे प्रमुख उपस्थित होते.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, दर निवडणुकीत आमची गंमत बघणाऱ्यांची आता एकास एक लढतीने गंमत झाली आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराचे हे गाव आहे. त्यांच्या पश्चात येथे दडपशाही सुरू झाली. पण या निवडणुकीत ही गुंडगिरी व हुकूमशाही गौरव नायकवडी यांच्या सहाय्याने आम्ही हद्दपार करू. स्व.वसंतदादा पासून स्व.संभाजी पवार यांच्या कुटुंबाला त्रास देण्याचे काम या नेतृत्वाने केले आहे. तेवढ्यावर न थांबता ते त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढीला ही त्रास देण्याचा उद्योग करत आहेत. विरोधकांना ३५ वर्षात या गावात बस स्थानक उभा करता आले नाही. नागनाथअण्णा यांनी हुतात्मा संकुलाची निर्मिती केली नसती तर येथील तरुणांना रोजीरोटीसाठी भटकंती करावी लागली असती. आता विरोधकांना त्यांच्या मुलाच्या राजकीय कारकिर्दीची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे ते येथे दडपशाही व गुंडगिरी पद्धत अवलंबत आहेत. आता या खुनशी प्रवृत्ती आपणाला या निवडणुकीत परिवर्तन करून हद्दपार करायचे आहे.

गौरव नायकवडी म्हणाले, एकास एक निवडणुकीने विरोधक हवालदिल झाले आहेत. जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतली आहे. आजपर्यंत दबाव तंत्र अवलंबून निवडणुका झाल्या. निवडणुका आल्यावर मतदारांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या व पुन्हा पाच वर्षे तिकडे पाठ फिरवायची, हेच काम विद्यमान आमदारांनी आजपर्यंत केलं आहे. आता आशा नेतृत्वाला धडा शिकवण्याची संधी आपलेला मिळाली आहे.सत्तेच्या जोरावर जिरवाजिरवी करणार्‍याची या निवडणूकीत मतदारच जिरवणार आहेत.

राहुल महाडिक म्हणाले, हुतात्मा गट ज्यांच्या पाठीशी असतो, त्यांचा विजय नक्की असतो. आजपर्यंत नायकवडी कुटुंबाने कोणतीही अपेक्षा न करता लोकहीत जपले. एकास एक लढतीमुळे निशिकांतदादांचा विजय नक्की आहे. आम्ही सर्व दादांच्या विजयासाठी एक दिलाने काम करत आहोत. 

यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्वासघातकी प्रवृत्तीचा बिमोड  करा..
        पृथ्वीराज पवार म्हणाले, ज्या जयंत पाटलांना तुंगाच्या पुढे कोण ओळखत न्हवते, त्यांना स्व .संभाजीआप्पांनी सांगलीत आणून ओळख निर्माण करून दिली. त्या आप्पांची त्यांनी काय अवस्था केली, तुम्ही बघितले. त्यांनी निर्माण केलेला कारखाना यांनी घशात घातला. स्वतःच्या मुलाप्रमाणे आप्पांनी त्यांना वागवलं. त्याच आप्पांचा त्यांनी केसाने गळा कापला. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन घडवून या विश्वास घातकी प्रवृत्तीचा बिमोड करा.

 विरोधकांकडून वाळव्याचे नाव पुसण्याचे काम....
        सरपंच संदेश कांबळे म्हणाले, विद्यमान आमदारांनी द्वेषापोटी आजपर्यंत वाळव्याचे नाव पुसण्याचे काम केलं. तालुका वाळवा असून इस्लामपूर तहसील, इस्लामपूर मतदार संघ असे सर्व इस्लामपूर केलं आहे. निशिकांतदादा तुमचा विजय निश्चित आहे. पण तुम्हाला आमची एक विनंती आहे की, तुम्ही आमदार झाल्यावर या मतदार संघाचे नाव वाळवा-इस्लामपूर मतदार संघ व्हावे व येथील श्रमिक नगरमधील लोकांना आठ अ चा उतारा मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत, तसेच द्राक्ष बागायतदारांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणी करावी.


Post a Comment

Previous Post Next Post