खुद्द देशाचे गृहमंत्र्यांना शिराळा मतदार संघात सभा घ्यावी लागते. यावरून मानसिंगभाऊ प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजय होणार हे स्पष्ट - जयंत पाटील



पाच वर्षात आ. मानसिंगराव नाईकांनी केलेली 2 हजार 275 कोटींची विकासकामे ऐकून आपला उमेदवार त्यांच्यापुढे कसा टिकणार, या विचाराने खुद्द देशाचे गृहमंत्र्यांना शिराळा मतदार संघात सभा घ्यावी लागते. यावरून मानसिंगभाऊ प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजय होणार हे स्पष्ट होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.
सागाव (ता. शिराळा) येथे  महाविकास आघाडीचे उमेदवार आ.मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, उमेदवार मानसिंगभाऊ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, प्रचितीचे अध्यक्ष राजेंद्र नाईक, तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील प्रमुख उपस्थित होते. 
प्रदेशाध्यक्ष म्हणाले, राज्यातील बहुतांशी मोठे प्रकल्प भाजप सरकारने गुजरातला स्थलांतरित केले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांना मिळणारा रोजगार बुडाला आहे. उत्पन्नात महाराष्ट्रात घट होत आहे. हे सर्व रोखून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव, मिळण्यासाठी, तरुणांना रोजगार निर्मिती करण्यासाठी व अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेवर येणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला आहे. तसाच तो विधानसभेला आपण मिळून शिकवायचा आहे. त्यासाठी शिराळा मतदार संघातील मतदारांनी कामाचा माणूस असलेल्या मानसिंगभाऊंच्या पाठीशी ठामपणे उभा राहून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. 
उमेदवार, आ. नाईक म्हणाले, मतदार संघाची प्रगती साधण्यात कमी पडलो नाही. हजारो कोटी रुपयांचा निधी आणून अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लावली आहेत. तरीही विरोधकांना केलेली विकास दिसत नाही. ते आमच्या सतत प्रगती साधणाऱ्या उद्योग समूहांवर टिका करत आहे. त्यांचे हे कृत्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा त्यांचा दारुण पराभवानंतर फुटणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासणारे सत्तेवर आणण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून मला पुन्हा काम करण्याची संधी द्यावी. 
यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, गेल्या पाच वर्षात आमदार मानसिंगभाऊंनी मतदार संघात केलेला विकास नेत्रदीपक आहे. शिराळा वाळव्यासाठी महत्त्वाची वाकुर्डे योजना त्यांनी पूर्णत्वाकडे नेली आहे. प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा विकासाच्या वाटेवर ते चालत आहेत. विरोधकांकडे विकासाचा कोणताच मुद्दा नसल्याने ते दुसऱ्याच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहेत. दगाबाजी करणाऱ्या या प्रवृत्तीला धडा शिकवणार आहे. 
प्रारंभी उदय पाटील यांनी स्वागत केले. शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष संदीप जाधव, बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील, तात्या पाटील, अजित कांबळे, अमित कुंभार आदींनी मनोगते व्यक्त केली. विश्वासचे संचालक बाबासो पाटील व बिरुदेव आमरे, माजी संचालक मानसिंग पाटील, वारणा बँकेचे संचालक बळवंत पाटील, उपसरपंच शशिकांत पाटील, दतात्रय आंदळकर, अनिल पाटील, संग्राम पवार, जगन्नाथ लोहार आदी मान्यवर कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 
--------------------- 

Post a Comment

Previous Post Next Post