आ.जयंत पाटलांना ३५ वर्षात इस्लामपूर एमआयडीसीमध्ये एखादा मोठा नवीन उद्योग आणून तरुणांना रोजगार देता आला नाही - सदाभाऊ खोत

निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांची बहे येथे सभा
इस्लामपूर : प्रतिनिधी
आ.जयंत पाटलांना ३५ वर्षात इस्लामपूर एमआयडीसीमध्ये एखादा मोठा नवीन उद्योग आणून तरुणांना रोजगार देता आला नाही. त्यांनी फक्त आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत आडवे पडायचे काम केले. ते आण्णासाहेब डांगे, स्व.एन.डी.पाटील यांच्या होणाऱ्या कारखान्यांना आडवे पडले. स्व संभाजी पवार यांनी काढलेला कारखाना त्यांनी हाणला, अशी जहरी टीका आ.सदाभाऊ खोत यांनी केली.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या प्रचारार्थ बहे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पृथ्वीराज पवार, गौरव नायकवडी, प्रसाद पाटील, निवास पाटील, केदार पाटील, सागर मलगुंडे, लालासाहेब पाटील, शहाजी पाटील, मधुकर हुबाले, यदुराज थोरात, गणेश शेवाळे प्रमुख उपस्थित होते.

आ.सदाभाऊ खोत म्हणाले, मी तीन वर्षे मंत्री होतो. जनतेने मला जे मागितलं ते मी त्यांना दिलं. परंतु मला पुस्तक कधी काढायची वेळ आली नाही. तुम्ही जनतेचा विकास खऱ्या अर्थाने केला असता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. माणूस उभा करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे थकलेलं बिल माफ करण्यात आले. मोफत वीज देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला. आता तर आमचे सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तर दुसरीकडे विरोधक म्हणतात ते सत्तेवर महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना बंद करणार. हाच दोन्ही सरकारमध्ये फरक आहे.

पृथ्वीराज पवार म्हणाले, परवा बोलताना कुठेतरी जयंत पाटील म्हणाले की, स्व.संभाजी पवार यांनी डोळ्यात पाणी आणून मला साखर कारखाना घ्यायला सांगितला होता. पण मी देवा शपथ सांगतो, तो माणूस खोट बोलत आहे. आम्ही दोघे भाऊ व आप्पा मुदत संपायच्या आधी १५ महिने त्यांच्याकडे पैसे दायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी पैसे स्वीकारले नाहीत. त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझा बाप खचला गेला. त्यावेळी आप्पा मला म्हणाले, मी ज्याला घरचा मुलगा म्हणून राजकारणात आणलं, त्यांनी केसाने गळा कापला. त्यामुळे मी लढणार आणि सर्वोदय कारखाना सभासदांच्या मालकीचा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. या विश्वास घातकी प्रवृत्तीचा बिमोड करण्याची हिच योग्य संधी आपल्याला आली आहे. त्यामुळे आपल्या आई-बहिणीची काळजी घेणाऱ्या निशिकांतदादांना आपण सर्वांनी निवडून द्यायच आहे. एवढेच मी यानिमित्त तुम्हाला आवाहन करतो.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर कुठलीतरी माहिती पुस्तिका काढली. पण त्यांनी घरोघरी पोहच केलेल्या पुस्तिकावर खर्च करण्यापेक्षा दिवाळीत त्यांच्या साखर कारखान्याला ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकाला १०० रुपयांचा बिलाचा हप्ता दिला असता तर माझ्या शेतकरी बांधवांची दिवाळी चांगली झाली असती.ज्यांनी पन्नास रुपयांची ओवाळणी कधी बहिणींना दिली नाही. ते आज लाडक्या बहीण योजनेला नावे ठेवत आहेत. पण याच माझ्या बहिणी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.

यावेळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

: टप्यात आणलंय... कार्यक्रम करा...
       गौरव नायकवडी म्हणाले, निशिकांतदादा व माझे गेल्यावेळचे मताधिक्य एकत्र केल्यास दादांचा विजय इथेच होतोय. पण यावेळी मतदार संघातून परिवर्तनासाठी मोठा उठाव झाला आहे. आता त्यांचेच कार्यकर्ते म्हणत आहेत की, आमच साहेब पडलं पाहिजेत. त्याशिवाय ते खाली येणार नाहीत. जयंत पाटील कायम म्हणत असतात टप्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करतो. पण आता उलटे झाले आहे. एकास एक लढतीमुळे आम्हीच त्यांना टप्यात आणले आहे. त्यामुळे जनता त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही.


Post a Comment

Previous Post Next Post