शेतकऱ्यांनो तुमचे आर्थिक शोषण करणाऱ्याला धडा शिकवा - निशिकांत भोसले-पाटील


इस्लामपूर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव सह साखर कारखाना रिकव्हरी कमी असूनही ३६३६ रुपये दर देतो. मात्र आपल्या तालुक्यातील उसाची रिकव्हरी जास्त असून ही येथील विद्यमान आमदारांचे कारखाने का जादा दर देऊ शकत नाहीत. ऊस दराच्या बाबतीत या जिल्ह्यात कोण अडवणूक करतो. इतर कारखान्यांना कोण दर देऊ देत नाहीत ? याचा विचार आता शेतकऱ्यांनी करायला हवा. हे थांबवायचे असेल तर आमदारकीच्या छत्रछायेखाली तुमचे आर्थिक शोषण करणाऱ्यांना या निवडणुकीत परिवर्तन करून धडा शिकवा, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केले.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील रेठरे हरणाक्ष येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी आ.सदाभाऊ खोत, गौरव नायकवडी, केदार पाटील, निवास पाटील, सागर मलगुंडे, धर्यशील मोरे, गणपतराव मोरे,पोपट पवार,शरद अवसरे,वीरेंद्र राजमाने, विनायक देशपांडे, उमेश कोळेकर प्रमुख उपस्थित होते.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, सहकार कायद्याप्रमाणे सलग तीन वर्षे आपण कारखान्याला ऊस घातला तर आपले सभासत्व कायम होत. परंतु विरोधकांनी जाणूनबुजून सभासद वारसांच्या नोंदी केलेल्या नाहीत. त्यांनी २० वर्षात फक्त दोनच सभासद केले. एक त्यांचा मुलगा व दुसरा त्यांचा भाऊ. यांचे घरचे सभासद होऊ शकतात तर आम्ही का नाही, हा येथील जनतेला पडलेला प्रश्न आहे. आता हे लोक बोलून दाखवणार नाहीत तर करून दाखवतील. उसाच्या दराशी माझा काय संबध नसल्याचे सांगणारे स्वतःच्या मुलाला कारखान्याचा सभासद व चेअरमन कसे करू शकले, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. ३५ वर्षात त्यांना रेठरे हरणाक्ष येथे शीघ्र कवी पट्टे बाबुराव यांचे स्मारक उभारता आले नाही. युवकांच्या हाताला रोजगाराचा देता आला नाही. मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडवता आले नाहीत. आशा अकार्यक्षम आमदारांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत मला आशीर्वाद द्या. पुढील पाच वर्षात समस्या मुक्त मतदार संघ तुम्हाला झालेला असेल.

गौरव नायकवडी म्हणाले, जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. लाडक्या बहिणीच परिवर्तन घडवणार आहेत. त्या कोणाचे आता ऐकायच्या मनःस्थितीत नाहीत. येथील लोकांना ऊस कोण नेहणार, याची भीती होती. पण आता मी येथे सगळी यंत्रणा लावली आहे. कोणालाही आता कोणतीही अडचण येणार नाही. 

यावेळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 फक्त गोड बोलून विकास होत नाही....
     केवळ गोड बोलून कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही तर त्याला विकास निधी खेचून आणण्याची चांगलीच धमक लागते, असा टोला, केदार पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला. ते म्हणाले, गेल्या ३५ वर्षांत मतदारसंघात विकास कामाचा साधा दगडही हलला नसून हा रखडलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी निशिकांतदादांनाच्या शिवाय पर्याय नाही. त्यांना या निवडणुकीत साथ द्या.

.

Post a Comment

Previous Post Next Post