इस्लामपूर : प्रतिनिधी
अनेक वर्षे आमदार व मंत्रीपदाचा वापर कारखानदारी वाढविण्यासाठी, शेतकर्यांचे अर्थिक शोषण करण्यासाठी, कपटी व विश्वासघातकी राजकारण करण्यासाठी करणार्या जयंत पाटील यांच्या अविचारी राजकारणाला एका विचाराने पूर्णविराम देण्यासाठी शेतकऱ्यांनी महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांना मोठे मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आ.सदाभाऊ खोत यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या प्रचारार्थ बावची, पोखर्णी, ढवळी, बागणी, भडखंबे, नागाव ,कोरेगाव, फार्णेवाडी (शि), शिगाव, रोझावाडी, फाळकेवाडी, गोटखिंडी येथे जुने कार्यकर्ते, तरुण मतदार यांच्या गाठी-भेटी दरम्यान आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) प्रमुख उपस्थित होते.
आ.सदाभाऊ खोत म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीत फारसा बदल नाही. असे असले तरी सांगली जिल्ह्यात ज्यादा रिकव्हरी असणारे अनेक कारखाने आहेत. तरीही कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने ते दर देत नाहीत. सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवणारे आ.जयंत पाटील हे दरवर्षी शेतकरी संघटनेच्या ऊसदर आंदोलनाला दाद देत नाहीत. कोणत्या प्रकारे ऊसदर आंदोलन मोडीत निघेल, यादृष्टीने ते पाऊले उचलत असतात. गेली अनेक वर्षे ते जिल्ह्यातील ऊसदर कोंडी फोडण्यापासून पळ काढत असल्याचे आपण पाहिले आहे. ते शेतकऱ्यांची गळचेपी करून आपल्या सोयीप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला बनवतात. यातून ऊस पुरवठादाराचे कसे अर्थिक शोषण होईल हेच धोरण जयंत पाटील यांचे असते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, येथील विद्यमान आमदार जिल्ह्यातील दुसऱ्या कारखान्यांना ही दर देऊन देत नाहीत. त्यांच्यावर दबावतंत्र अवलंबतात. त्यांच्या राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव व कारंदवाडी या तीन युनिट मधूनच दोन्ही हंगामातील ऊस दराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो. एकीकडे मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना दोन वर्षात १० हजार नवीन सभासदांना सभासदतत्व देत आहे. तर दुसरीकडे वाळवा तालुक्यातील आ.जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याकडून सभासद मयत झाला असेल तर त्याचे सभासदतत्व रद्द करण्याचे पाप सुरू आहे.
यावेळी बावची, पोखर्णी, ढवळी, बागणी, भडखंबे, नागाव ,कोरेगाव, फार्णेवाडी (शि), शिगाव, रोझावाडी, फाळकेवाडी, गोटखिंडी येथील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे अर्थिक शोषण करणाऱ्यांचा पाडाव करा...
शेतकऱ्यांचे अर्थिक शोषण करुन निवडणूक लढवणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांना व कारखानदाराला अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे. तरी सर्व शेतकरी बंधूंनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.जयंत पाटील यांचा पाडाव करण्यासाठी निशिकांतदादांना साथ द्या, असे आवाहन ही आ.सदाभाऊ खोत यांनी केले.
Tags
सांगली प्रतिनिधी