सांगलीच्या उमेदवारीवर जयश्री पाटील यांचाच हक्कउमेदवारी न दिल्यास जिल्ह्यात फटका- मिरज भागातील कार्यकर्त्यांचा इशारा



सांगली: 
सांगली विधानसभेची उमेदवारी जयश्री पाटील यांनाच मिळायला हवी. त्यावर त्यांचाच हक्क आहे. जर जयश्री वहिनींना काँग्रेस मधून उमेदवारी मिळाली नाही तर त्याचा फटका संपूर्ण सांगली जिल्ह्याला काँग्रेस पक्षाला बसू शकतो, असा इशारा मिरज भागातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.
अनिल अमटवणे, तानाजी पाटील, सुभाष खोत, खंडेराव जगताप, महावीर कागवाडे, उज्वल शिंदे, कपील कबाडगे, रणजीत देसाई, श्रीमंत पाठरे या व इतर अनेक कार्यकर्त्यांची आज बैठक झाली. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे नेते मदन भाऊ पाटील यांच्या पश्चात जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष तसेच मदनभाऊ गट प्रामाणिक सांभाळण्याचे काम करत आले आहेत. गेल्या 2019 च्या विधानसभेच्या वेळी जयश्री वहिनींना पक्षातून तिकीट मिळत असताना अचानक ते इतरांना देण्यात आले, पण जयश्री वहिनींनी पक्षाचे काम प्रामाणिक केले, आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पण त्यांना संघर्ष करावा लागतो आहे. महिलांना उमेदवारी द्यावी हे काँग्रेस पक्षाची भूमिका असताना जयश्री वहिनींना संघर्ष करावा लागणे योग्य नाही. जर वहिनींना काँग्रेस मधून उमेदवारी मिळाली नाही तर त्याचा फटका संपूर्ण सांगली जिल्ह्याला काँग्रेस पक्षाला बसू शकतो. आजपर्यंत मदन भाऊ आणि जयश्री वहिनी यांनी केलेले काम आणि त्यांचे योगदान लक्षात घेऊन पक्षाने वहिनींना विधानसभा लढवण्यास संधी द्यावी व मदन भाऊ प्रेमी तसे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना बळ द्यावें, अशी भावना यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्री पाटील यांच्या रूपाने पुन्हा एकदा विजयाचा गुलाल मिळवायचा आहे. माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड विकास कामे केली आहेत. जयश्री पाटील यांना आमदार करून मदन भाऊंच्या कामाची पोहोच पावती देण्याची वेळ आता आली आहे. काहीही करून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जयश्री वहिनींना आमदार करायचे आहे असा निश्चय करून प्रचाराचा धुरळा उठवून असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या आमदार जयश्री पाटीलच असतील अशी ग्वाही दिली. 
डॉक्टर जितेश कदम, माजी महापौर किशोर शहा, ज्येष्ठ कार्यकर्ते सिकंदर जमादार, सुभाष यादव, संग्राम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दादा अण्णा एकत्र
जयश्री पाटील यांना सांगलीच्या आमदार करण्यासाठी वसंतदादा पाटील आणि विष्णू अण्णा पाटील यांची कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांच्या मागे मदन भाऊ पाटील यांच्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद उभी झाली आहे. यामुळे जयश्री वहिनी यांचा विजय निश्चित असल्याची भावना आणि कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post