स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही - ना.अजित पवार

 



इस्लामपूर : प्रतिनिधी
 इस्लामपूरची बारामती करतो म्हणाऱ्यांना तुम्ही सात टर्म संधी दिली. पण त्याकडून काही झालं नाही. त्यांना फक्त मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत. स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही. ते फक्त भूलथापा मारण्यात पटाईत आहेत. आता खोटे बोलणाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्याची वेळ आली आहे. वाळव्यातील जनतेला ते नवीन नाही. तुम्ही सर्वांनी एकत्र रहा व परिवर्तन करा. निशिकांतदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या. येणाऱ्या पाच वर्षात बारामती काय त्यापेक्षा ही चांगला विकास करण्यासाठी निशिकांतदादांना निधीची कमतरता मी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ.सदाभाऊ खोत, आ.इंद्रिस नायकवडी, माजी आ.भगवानराव साळुंखे, भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष दिपक शिंदे, प्रभाकर जमदाडे,
भाजपाचे नेते सी.बी.पाटील, गौतम पवार, सत्यजित देशमुख, माजी जि.प.सदस्य भीमराव माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, रयत क्रांती संघटनेचे सागर खोत, माजी नगरसेवक विक्रम पाटील, पद्माकर जगदाळे, मन्सुरभाई मोमीन,  जमील बागवान, माजी नगरसेवेक सनी मानकर,  मनसेचे सनी खराडे प्रमुख उपस्थित होते.

ना.अजित पवार म्हणाले,  या निवडणुकीत आपलेला क्रांती करायची आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राज्यात महायुती सरकार यायला हवे. खोटे निरेटिव्ह पसरून विरोधक समाजात तेढ निर्माण करत आहेत.  आम्ही सत्तेला हपापलेलो नाही. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. आम्ही बोलतो तसेच वागतो. आम्ही तसा कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही. करेक्ट कार्यक्रम करून कोणाचा होत नाही. ते जनतेच्या हातात असते. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे. २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यावर हे पैसे आले आहेत. विरोधक म्हणतात आम्ही सत्तेवर आलो की, ही योजना बंद पाडू. ही योजना तुमच्या काकाने आणल्या काय. तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. ही योजना चालू ठेवण्याची जबाबदारी माझी असेल. योजना देताना मी मागचा पुढचा विचार केला आहे. महिला वर्गाला आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना आम्ही केली आहे. आम्ही समाजातील कोणत्याही घटकाला विकासापासून वंचीत ठेवणार नाही. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देत आहोत. सरकार ते लाभार्थी, असा थेट लाभ देत असल्याने यात कोणताही भ्रष्टचार व्हायला जागा नाही. सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. गारपीट, अवकाळी ग्रस्त शेकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांनी वीज माफी दिली. एक रुपयांत पीक विमा, दुधाला अनुदान हे सर्व चालू ठेवायचे असेल तर निशिकांतदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या.

आ.सदाभाऊ खोत म्हणाले,  महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. नदी जोड प्रकल्प राबवले गेले. ४६ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे थकलेलं बिल माफ केले. मोफत वीज देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. महिलांच्या खात्यावर १ हजार ५०० रुपये टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला.
अजितदादा तुम्ही या वाळवा मतदार संघाची काळजी करू नका. हा तालुका कुणाची जहागिरी नाही. तुम्ही दिलेल्या उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून मी व माझे कार्यकर्ते काम करतील. मिरज तालुक्यातील आठ गावातून भीमरावआण्णा तुम्ही निशिकांतदादांना लीड द्या. अजितदादा तुम्हाला आमदार काय राज्यपाल करतील. शिराळ्यात कमळ व वाळव्यात घड्याळ निवडून आणल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. काहींना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागल्यात. पण स्वप्न पडून काही होत नाही. त्यांना माहीत आहे ओटिंग केल्यावर दोन मते पडली होती. आपण सर्व मिळून या तालुक्याला गुलामगिरीतून मुक्त करूया.

आ.इंद्रिस नायकवडी म्हणाले, माझ्या आमदारकीच्या रूपाने अजितदादांनी या तालुक्याला ऍडव्हान्स दिला. आता फायनल म्हणून निशिकांतदादांना संधी दिली आहे. आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यायचे आहे. मला बोलयचे तर भरपूर आहे. योग्य वेळी बोलीन. अजितदादांनी सर्व समाजाला न्याय दिला आहे. ते सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जात आहेत. निशिकांतदादांना मिळालेल्या संधीचे आपण सोने करूया. त्यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देऊया.

निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, या तालुक्यातील लोकांना गुलामगिरतीतून मुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. आज निघालेली रॅली ही माझ्या विजयाची नांदी आहे.  लाडकी बहीण योजनेचे स्वागत साऱ्या राज्यातील आमदार व भगिनींनी केलं. परंतु या योजनेला या तालुक्यातील आमदारांनी विरोध केला. अजितदादा तुम्ही या मतदार संघातील  क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी ९३ कोटी दिले. पण हा निधी मागे घालवण्याचे काम येथील विद्यमान आमदारांनी केल. त्यांनी बारामतीची स्वप्ने येथील जनतेला दाखवली. पण त्यांनी ३५ वर्षात फक्त करामती करण्याचे काम केलं. या तालुक्यात विकास सर्वसामान्य लोकांचा झाला नाही तर तो या आमदारांच्या पै-पाहुण्यांचा झाला. ४० वर्षात पाणंद रस्ते झाले नाहीत. आता आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून २६ कोटीचे पाणंद रस्ते केले. आमची रिकव्हरी जास्त असून ही आमचे ४७१ रुपये कुणाच्या तरी खिशात जात आहेत. दिवाळीतही त्यांना येथील शेतकऱ्यांची दुःखे दिसत नाहीत. त्यांना पेठ-सांगली रस्ता करता आला नाही. त्यावर शेकडो बळी गेलेत. कोरोना काळात ही त्यांनी माझे हॉस्पिटल बंद पडण्याचे काम केलं. माझ्या ७४ वर्षाच्या आईला अटक करण्याचा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. त्यांना हृदय आहे का नाही, ही शंका आहे. त्यामुळे मी जिवंत आहे, तोपर्यंत जयंत पाटील यांचे खुनशी राजकारण संपवल्या शिवाय मी गप्प बसणार नाही. त्यामुळे ही हुकूमशाही संपवण्यासाठी मला या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या.

सागर खोत, केदार पाटील यांची भाषणे झाली. इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील यांनी आभार मानले. यावेळी शहर भाजपा अध्यक्ष अशोक खोत, जयराज पाटील,  सतेज पाटील, उमेश आवटी, विरेंद्र राजमाने अमित कदम, तैसीन आत्तार, सुरेखा जगताप, आशाताई पवार, सुनीता काळे, निवास पाटील, मन्सुर वाठारकर, धैर्यशील मोरे, संजय बेले, प्रविण माने, मधुकर हुबाले, संदीप सावंत, रणजित माने, चंद्रकांत पाटील, दादासाहेब रसाळ, राहुल पाटील,यदुराज थोरात, अक्षय पाटील, अजित पाटील, प्रवीण परीट, विश्वजीत पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असल्या माणसाला मुख्यमंत्री करायचं का?.
  अजित पवार म्हणाले, निशिकांतदादांच्या उमेदवारीने काहींना धडकी भरली. आजपर्यंत त्यांना दाबून ठेवलं गेलं. निसर्गाचा नियम आहे. जेवढं दाबून ठेवलं जातं.. त्याच गतीने उसळी घेतली जाते. काहींनी सर्वोदय कारखाना घशात घातला. नेत्याने कार्यकर्त्याला कारखाना काढून द्यायचा असतो, खायचा नसतो. आमची रिकव्हरी कमी असून ही मला ३६३६ रुपये दर द्यायला परवडतो तर यांना का परवडत नाही. ते फक्त स्वतःच्या मालमत्तेत भर घालण्याचे काम करत आहेत. मग असल्या माणसाला मुख्यमंत्री करायचं का?.

 ते एक व्यक्ती नसून अपप्रवृत्ती...
       सी.बी.पाटील म्हणाले, जयंत पाटील एक व्यक्ती नसून अपप्रवृत्ती आहे. त्यांच्या गुलामगिरीला जनता वैतागली आहे. त्यामुळे जनतेने ठरवले आहे, आता परिवर्तन करायचे. घरा-घराता भांडणे लावणाऱ्या या नेत्याने आजपर्यंत फक्त घरे फोडण्याचे काम केले. अजित दादांचे ही घर फोडायला ते कमी पडले नाहीत. तसेच शरद पवार हे मराठा द्वेषी आहेत. हे साऱ्या जनेतला माहीत आहे. अजितदादा तुम्ही फक्त वाळवा व शिराळा या दोन्ही ठिकाणी एकास एक लढत करा. दोन्ही उमेदवार निवडून द्यायची जबाबदारी आमची राहील.

कुजके राजकारण करणारे पार्सल कासेगावला पाठवा..
     गौतम पवार म्हणाले, हा कार्यक्रम जरी निशिकांतदादांचा अर्ज भरायचा असला तरी हा कार्यक्रम जिल्हयातील कीड नष्ट करायचा आहे. जिल्हयातील नेत्यांना कुजवायचे काम आ.जयंत पाटील करत आहेत. त्यामुळे निशिकांतदादांना या निवडणुकीत निवडून देऊन हे कुजके राजकारण करणारे पार्सल कासेगावला तुम्हाला पाठवायची जबाबदारी तुमची आहे.


Post a Comment

Previous Post Next Post