हॉटेल व्यवसायिकांना विनाकारण त्रास नको-जयश्री पाटील यांची पालकमंत्र्यांशी चर्चा



सांगली: 

कोविड परिस्थितीतून कसेबसे सावरत असताना आता पुन्हा पूरग्रस्त परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत अडकलेल्या हॉटेल व्यवसायिकांना विनाकारण त्रास देऊ नका, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांनी केले. याबाबत त्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे व सहाय्यक आयुक्त यांच्याशी चर्चा केली.


गेल्या काही दिवसापासून अन्न व औषध प्रशासनाकडून सांगली आणि मिरजेतील हॉटेल व्यवसायिकांना स्वच्छता आणि सोयीचा अभाव असल्याच्या कारणावरून नोटीस पाठवण्यात येत आहेत. यानंतर वैतागलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी आज जयश्री पाटील यांची भेट घेतली आणि वारंवार होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारी मांडल्या. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या हॉटेल व्यवसायिकांना शासकीय यंत्रणा विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी मांडली. 



यावेळी जयश्री पाटील यांनी पालकमंत्री सुरेश खाडे व सहाय्यक आयुक्तांची फोनवरून चर्चा केली. हॉटेल व्यवसायिकांच्या आर्थिक घुसमटीची माहिती देऊन वारंवार होणारा त्रास थांबवावा अशी विनंती केली. यावर पालकमंत्री व सहाय्यक आयुक्त यांनी भविष्यात हॉटेल व्यवसायिकांना कोणताही त्रास होणार नाही असे आश्वासन दिले.

जयश्री पाटील यांनी आपल्या त्रासाबद्दल शासकीय यंत्रणा आणि पालकमंत्र्यांशी चर्चा केल्याबद्दल खाद्य पेय विक्रेता चालक-माल संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post