आरक्षणावर दरोडा टाकण्याचे काम मनोज जरांगे-पाटील करत आहेत.मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यामुळे सरकारने सग्यासोयर्यांचा आदेश काढू नये व ओबीसीतून कुणबींना दिलेले 57 लाख दाखले रद्द करावेत, अन्यथा सरकारशी दोन हात करू, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार बैठकीत दिला. तर ना. भुजबळ तिथे जातील तेथील उमेदवार पाडा, अशी भाषा जरांगे करत आहेत. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, कोणता उमेदवार निवडून आणायचा हे जनता ठरवते, असा टोला देखील त्यांनी लगाविला. तर रविवारी होणार्या मेळाव्यात ओबीसींची ताकद दाखवू, असे त्यांनी सांगितले.
प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र त्यांना गोरगरिब ओबीसीमधून आरक्षणामधून देऊ नये. याला आमचा विरोध आहे. आरक्षणावर दरोडा टाकण्याचे काम मनोज जरांगे-पाटील करत आहेत. जरांगे-पाटील यांनी पूर्वी गरिब मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सग्यासोयर्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. हे चुकीचे आहे. मराठा समाज अनेक आरक्षणामधून सध्या सवलत घेत आहे. तरी देखील त्यांना आता ओबीसीमधून आरक्षण हवे आहे. भविष्यात ते एसटी प्रवर्गातून देखील आरक्षण मागतील. हे चुकीचे आहे.
सरकारने त्यांच्या दबावाखाली सग्यासोयर्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढू नये. कुणबी म्हणून दिलेले 57 लाख दाखले तातडीने रद्द करावेत ही प्रामुख्याने मागणी ओबीसी सामाजाची आहे. त्यासाठी रविवारी सांगलीत महाएल्गार मेळावा होणार आहे. शासनाने जर ओबीसी समाजाच्या विरोधात निर्णय घेतला तर शासनाशी देखील दोन हात करू, असा इशारा शेंडगे यांनी दिला.
रविवारी तरूण भारत स्टेडियमवर दुपारी दोन वाजता एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व पुणे येथून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तर ना. छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, आ. पंकजा मुंडे,आ. गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाक्के, शब्बीर अन्सारी यांच्यासह ओबीसी समाजातील विविध नेते, पदाधिकारी मेळाव्याला मार्गदर्शन करणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. शब्बीर अन्सारी म्हणाले, मंडल अधिकार्यांच्या शिफारसीवरून ओबीसीमधून विविध समाजाला आरक्षण मिळाले, मुस्लिम समाजाला देखील यातून आरक्षण आहे. रविवारी होणार्या मेळाव्यासाठी मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.
जरांगे यांची चळवळ राजकीय दिशेने; प्रतिसाद कमी
मनोज जरांगे-पाटील पूर्वी गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लढत होते. मात्र आता त्यांची चळवळ भरकटली आहे. ते राजकीय दिशेने जात आहेत. उमेदवार पाडू उमेदवार उभे करू, अशी भाषा त्यांची आहे. देशातील अनेक राज्यात आंदोलने झाली. पण त्यांचे आंदोलन राजकीय हेतूने आहे. त्यामुळे त्यांना सांगलीत प्रतिसाद कमी मिळाला. कोल्हापुरात देखील कमी मिळाला असे कळल्याचे वृत्त असल्याचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
यावेळी संयोजक माजी महापौर संगीता खोत, सविता मदने,संजय विभूते, माजी नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, अतहर नायकवडी, प्रदीप वाले, यांच्यासह ओबीसी नेते व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी