सांगली:
शंभर फुटी ते धामणी या रस्त्यावर 24 तास वाहनांची वर्दळ वाढली असून शाळा, नागरी वस्तीही वाढली आहे. पण वर्दळ वाढलेली असतानाही या रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने अपघातांची संख्या वाढते आहे. या रस्त्याचे त्वरीत रुंदीकरण करावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी केले.
याबाबत आज जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पाटील म्हणाल्या, कर्नाटकातून येणारी आणि कोल्हापूर जिल्हात जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. शिवाय धामणी परिसरात चार शाळा आणि प्रचंड वाढत चाललेली लोकवस्ती, मोठमोठी हॉस्पिटल्स मुळे या हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आणि धोकादायक बनला आहे. जीव मुठीत धरुनप्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा धोका वाढला आहे. हा रस्ता तीस फुटीचा असून 80 फुटी करावा, अशी मागणी नागरीकांची असून याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास महापालिका आणि जिल्हा अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
अदिनाथ बापू मगदूमल, सुहास पाटील, प्रदीप मगदूम, संदीप पाटील, बाहूबली कबाडगे, राजेंद्र आगरे, अमित बस्तवडे, करण चौगुले, श्रीकांत हनगुंडे आदी नागरीकांनी हे निवेदन दिले.