सांगली प्रतिनिधी : देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता खासदार संजयकाका पाटील यांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी केले.
पतंजली योग समिती भारत स्वाभिमान न्यास, महिला पतंजली योग समिती, युवा भारत किसान पंचायत या संस्थांच्या वतीने संयुक्त मेळावा आज सांगली येथील वारणा हॉलमध्ये घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शेखर इनामदार बोलत होते.
शेखर इनामदार म्हणाले, पतंजली योग समितीच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य जोपासण्याचे कार्य हे राष्ट्र कार्य म्हणून अतिशय महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण राष्ट्राच्या विकासाबरोबर आरोग्यदायी राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देत आहात. सर्वच बाबतीत देश प्रगतीपथावर आहे. जगभरात एक सशक्त देश म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. लवकरच भारत हा महासत्ता होणार आहे. भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान मोदी यांनी आणली आहे. येणाऱ्या काळात आपल्याला अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे. सर्वसामान्य माणसांचा विकास आणि त्यांचे जीवन सुखमय करण्यासाठी मोदीजी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. उद्योग, शेती, सिंचन याचबरोबर अवकाशीय प्रकल्पात आपण प्रगती केली आहे. 25 कोटी लोकांना गरीब इथून बाहेर काढले आहे. एक सशक्त आणि बलवान देश करण्याचे काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विश्वगुरू म्हणून सारे जग पाहत आहे. तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करून देशाच्या उन्नतीची दिशा ठरवण्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार संजयकाका पाटील यांना मतदान करून विजयी करावे. संजयकाकांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे हे आपण लक्षात ठेवावे. असे आवाहन शेखर इनामदार यांनी केले.
दीप प्रज्वलनाने या मेळाव्याचा प्रारंभ झाला मेळाव्याच्या पहिल्या सत्रात आहार आणि दिनचर्या या विषयावर डॉक्टर अजित पाटील यांचे व्याख्यान झाले. दुसऱ्या सत्रात शेखर इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी या मेळाव्यास सदिच्छा भेट दिली.
व्यासपीठावर शेखर इनामदार, भारत स्वाभिमान न्यासाचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्याम वैद्य, राज्य संवाद प्रभारी सौ. अस्मिता जोशी, माजी नगरसेविका भारती दिगडे प्रमुख उपस्थित होते.
राज्य कार्यकारणी सदस्य स्नेहल कुलकर्णी, राज्य मीडिया प्रभारी मंगल वैद्य, महिला जिल्हा प्रभारी सुलभा कांबळे, राज्य युवा प्रभारी बस्वराज माळी यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तालुक्यातील पदाधिकारी व पतंजली योग समितीचे कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.
Tags
महासंग्राम 2024