इस्लामपूर : प्रतिनिधी
गेल्या २० वर्षापूर्वी पेठ-सांगली रस्ता व रिंगरोड झाले असते तर इस्लामपूर शहराच्या व्यापार वाढीला चालना मिळाली असती. कोल्हापूर शहरापेक्षा ही हे शहर विकसित झाले असते. परंतु शहराच्या विकासाला खीळ घालण्याचे काम विरोधकांनी केलं आहे. त्यामुळे गेली ३५ वर्षे इस्लामपूर विधानसभा मतदार संघाला बारामतीसारख्या विकास कामांचे गाजर दाखवणाऱ्या कर्तृत्वहीन विरोधकांना या निवडणुकीत परिवर्तन घडवून त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केले.
इस्लामपूर शहरातील रामभाऊ शेवाळे घर, शिदे सरकार घर, घरकुल, कुंभार गल्ली, उरुणवाडी येथे प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. यावेळी गौरव नायकवडी, केदार पाटील, विक्रम पाटील, कपिल ओसवाल,अमित ओसवाल, अशोक खोत, अजित पाटील, अक्षय पाटील, सनी खराडे, सुजित थोरात, आशा पवार, सुनीता काळे, स्मिता पवार, ज्ञानेश्वरी देशपांडे, प्रवीण परीट, अक्षय कोळेकर प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, विरोधक म्हणतात माझ्या विरोधात उभा राहिलेला माणूस पुढल्या वर्षी माझ्या विरोधात उभा राहत नाही. परंतु मी त्यांना सांगेन या संभूआप्पांच्या पंढरीत अहंकार व आहमपणा चालत नाही. जनताच आता त्यांचा आहमपणा दूर करेल. विरोधकांनी कधी ५० रुपये बहिणींना ओवाळणी टाकली नाही. पण महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणून महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाउल उचलले. परंतु तेच विरोधक आज ही योजना बंद पाडायला कोर्टात गेले. ३५ वर्षात शहराला काय मिळाले तर महिला मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर जाणारे नगरसेवक व घंटा गाडीतून दारू वाहतूक करणारे नगरसेवक, मग शहराचा कसा विकास होईल. तुम्ही ज्याला निवडून देता ते लोकप्रतिनिधी कोरोना संकटात कुठे होते, मोक्याचे भूखंड कोणी गिळले, एवढे वर्षे शहरातील अंतर्गत रस्ते का झाले नाही, हा जाब विचारायची ही वेळ तुमच्यावर आली आहे. इस्लामपूर एमआयडीसीमध्ये नवीन कंपन्या त्यांना आणता आल्या नाहीत. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. आज तरुणांना कागल व पलूसकडे रोजगारासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. भुयारी गटारीला कोणी विरोध केला, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांना परिवर्तन करून धडा शिकवा.