सांगली
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या इनाम धामणी ता. मिरज येथील शाखेचे प्रशस्त व आधुनिक कार्यालयात स्थलांतरण कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचे अमृतहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. श्रीमती उर्मिला राजमाने- कवठेकर, उपनिबंधक सहकारी संस्था सांगली या प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्री. अनिल पैलवान हे देखील उपस्थित होते.
कर्मवीर पतसंस्था आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक व सहकार चळवळीच्या तत्वाने काम करीत आहे. एखादी संस्था ११०० कोटीच्या पुढे ठेवी गोळा करु शकते हे सभासदांचा संस्थेप्रती असणारा विश्वास दाखविते आणि आपल्या भागातील संस्था ही राज्य पातळीपर्यंत आपल्या कार्याने नावारुपाला येत आहे हे कौतुकास्पद असल्याचे मत श्रीमती उर्मिला राजमाने- कवठेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले. स्वागत व प्रास्ताविक करताना चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील म्हणाले कि, संस्थेने सभासद सेवकांच्यासाठी आणलेल्या अनेक योजना या राज्य पातळीवर आदर्श ठराव्यात अशा आहेत. गेल्या ३७ वर्षापासून संस्था नियमित चांगले उपक्रम राबवित आहे याचे श्रेय संचालकांचे उत्तम नियोजन आणि त्यास सभासद आणि सेवकांनी दिलेली साथ याला आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्वांचे योगदान हे अमुल्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्था आर्थिक भक्कम पायावर उभी असून नजीकच्या काळात आणखी सेवा वाढविण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.