ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव देण्यास टाळाटाळ : रयत विकास आघाडी व युवाशक्तीकडून उपोषण
इस्लामपूर : प्रतिनिधी
आ.जयंत पाटील ज्या गावात मतदानाचा हक्क बजावतात,ज्या गावात राजारामबापु साखर कारखाना आहे.आ.जयंत पाटील यांची सत्ता आहे,अशा साखराळे (ता.वाळवा) येथे विविध विकास कामांचे प्रस्ताव मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून ते दिले जात नसल्याने येथील संतप्त ग्रामस्थांनी आज महात्मा गांधी जयंती दिनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत प्रस्ताव दिले जात नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती रयत विकास आघाडी व युवाशक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.मात्र आ.जयंत पाटील यांना लोकशाहीचा विसर पडला असुन विकासाला खोडा घालण्यात त्यांचा हातखंडा आहे तो आता लोकशाही मार्गाने मोडुन काढु असा इशारा उपोषण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.
साखराळे गावातील पाणंद रस्ता, तांडा वस्ती व रुंदीव वसाहत या ठिकाणी ९५/५ व ८५/१५ योजनेतून निधी मंजूर झाला आहे. तसेच 'क' वर्ग तीर्थक्षेत्र मधून श्री भैरवनाथ मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी डीपीडिसीमधून निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी लागणारे मागणीपत्र व प्रस्ताव साखराळे ग्रामपंचायतीकडे प्रलंबित आहेत. पंचायत समिती, रयत विकास आघाडी व युवाशक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही ते प्रस्ताव दिले गेलेले नाहीत. त्यामुळे तात्काळ ते प्रस्ताव द्यावेत, अन्यथा दि.२ ऑक्टोंबर रोजी 'महात्मा गांधी' जयंती दिनी साखराळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. प्रस्ताव दिले न गेल्याने रयत विकास आघाडी व युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
यावेळी बोलताना भाजपाचे तालुका उपाध्यक्ष प्रा.दत्तात्रय पाटील म्हणाले, गावातील विकास कामासाठी पालकमंत्री ना.सुरेश खाडे, खा.धैर्यशील माने व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा उच्चांकी निधी गावाला प्राप्त झाला आहे. परंतु गावात आपलाच बोर्ड लागला पाहिजे, दुसरा कोणाचा बोर्ड लागला नको पाहिजे. ही भूमिका ठेवून ग्रामपंचायतीकडून सदर कामांचे प्रस्ताव दिले गेलेले नाहीत. त्यामुळे आज ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात गांधी जयंती दिनी आम्ही उपोषण सुरू केले आहे.
यावेळी ॲड.पोपट पवार, दादासो पाटील, धनाजी पाटील, अमित निकम पाटील, अमित चव्हाण, वैभव साळुंखे, गणेश बाबर यांच्यासह रयत विकास आघाडी व युवाशक्तीच्या पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा), शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आंनदराव पवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांशी चर्चा केली. तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील, इस्लामपूर शहर मंडळ अध्यक्ष अशोक खोत,ॲड.उमेश कोळेकर, शिवसेनेचे सागर मलगुंडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला.
चौकट : गावासाठी जीव गेला तरी चालेल...
यावेळी बोलताना अशोक पाटील म्हणाले, साखराळे गावामध्ये जो ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू आहे. त्या विरोधात आवाज उठवण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे. गावातील विविध प्रश्नी आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीला निवेदने दिली. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता आम्ही विविध मार्गाने निधी आणतोय तर तो आढवायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला हे प्रस्ताव मिळत नाहीत. तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील.आम्ही आता आमच्या जीवाची ही पर्वा करणार नाही,विकासाला खोडा घालणार्या नेतृत्वाचा खरा चेहरा गावालाच नव्हे तर तालुक्याला माहीत आहे भविष्यात ही वृत्ती मुळापासुन काढण्यासाठी स्वाभीमानाने जनता पुढे येईल.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी