आ.जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला - निशिकांत भोसले-पाटील (दादा)

 

इस्लामपूर : प्रतिनिधी

  सुसंस्कृत, शांत विचारांचा मुखवटा परिधान केलेल्या आ. जयंत पाटलांचा मुखवटा आता गळून पडला आहे. त्यांचा मूळ चेहरा आता जनतेसमोर आला आहे. राजकीय द्वेषपोटी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त व त्यांच्या संस्था संपवू पाहणाऱ्या या आमदारांना यापुढील राजकारणातून हद्दपार करण्यासाठी क्रांतीकारक मातीतील मतदार पुढे येईल. मला वाळवा तालुक्यातील जनतेने साथ द्यावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी पत्रकार परिषदेत केले.


यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य व इस्लामपूर विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील प्रमुख उपस्थित होते.


निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, सांगली जिल्हा वेगळ्या राजकीय संस्कृतीचा व संस्काराचा आहे. स्व.वसंतदादा पाटील, स्व. गुलाबराव पाटील, स्व.नागनाथअण्णा नायकवडी, स्व.एन.डी.पाटील, स्व.लोकनेते राजारामबापू पाटील, स्व.प्रकाशबापू पाटील, स्व.मदन पाटील, स्व.जी.डी. बापू लाड, अशा अनेक कर्तबगार माणसांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. सांगली जिल्ह्यातील तत्कालीन अनेक नेते  मंडळींमध्ये मतभेद असायचे. ते विकासाठी असायचे. ते मतभेद निवडणूक संपली की संपून जायचे. किंबहुना विरोधकांच्या चांगल्या धोरणाला, चांगल्या विचाराला पाठिंबा देण्याचा स्व. वसंतदादांनी सातत्याने प्रयत्न केला होता. 

    अशा सुसंस्कृत नेत्यांच्या जिल्ह्यांमध्ये एक अत्यंत खुनशी, कपटी वैरभावना जागृत ठेवणारा, द्वेषाचे राजकारण पराकोटीचे करून विरोधकांची कुटुंब उध्वस्त करण्यासह त्यांच्या संस्था उध्वस्त करण्यापर्यंत प्रयत्न करणारा नेता या तालुक्यामध्ये जन्माला आला, हे वाळवा तालुक्यातील जनतेसाठी मोठी दुर्दैवाची बाब आहे.


     स्व. वसंतदादा, स्व. राजारामबापू यांच्या वैचारिक मतभेदाचा लढा संपला असतानाही त्यांच्या निधनानंतरही तीन पिढ्या तो द्वेष डोक्यात ठेवून स्व. वसंतदादा यांचे नातू प्रतीक व आता विशाल पाटलांपर्यंत दादा घराण्याचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे व त्यांना राजकीय दृष्ट्या उध्वस्त करण्याचा कुटील कारस्थान वाळवा तालुक्याचाअविचारी नेता करीत आहे, ही अत्यंत दुर्देवाची बाब आहे. शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी मंत्री तथा या तालुक्याचे ३५ वर्षे राहिलेल्या आमदारांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या पुढे आणला आहे. 

   सुसंस्कृत शांत विचारांचा मुखवटा परिधान केलेल्या आ. जयंत पाटलांचा मुखवटा गळून पडल्यानंतर मूळ चेहरा समोर आल्यावर या जिल्ह्यातल्या अनेक राजकीय लोकांना त्यांच्यावर आलेले प्रसंग किंवा राजकीय जीवनातून त्यांना उठवण्याची केलेली कटकारस्थान हे डोळ्यासमोर आली असतील. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन शैक्षणिक व आरोग्य मंदिर उभा करतोय व हजारो रुग्णांना मोफत उपचार देतोय. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून करतोय. परंतु राजकीय द्वेषपोटी ते माझी संस्था, आरोग्य मंदिर संपवायला गेले होते. माझ्या वृद्ध आई व पत्नीवर तसेच शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यासाठी ते पोलिस प्रशासनावर दबाव आणत होते, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता त्यांना यापुढे त्यांच्या पद्धतीने जसासतसे उत्तर दिले जाईल.


यावेळी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सुरेखा जगताप, शहर अध्यक्ष अशोकराव खोत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, निशिकांतदादा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले-पाटील, निशिकांतदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रा.दत्तात्रय पाटील, भास्कर मोरे, सरचिटणीस यदुराज थोरात, प्रवीण परीट, विश्वजीत पाटील भास्कर कदम, रणजित माने,  यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post